सरकारची तीन वर्षे बोलण्यात गेली, उरलेली वर्षे डोलण्यात जातील

सरकारची तीन वर्षे बोलण्यात गेली, उरलेली वर्षे डोलण्यात जातील

सामनातून राज्य सरकारवर टिका

मुंबई : माजी मंत्री एकनाथ खडसे आणि बबनराव लोणीकर आणि गिरीश बापट या दोन मंत्र्यांनी सरकारबद्दल विधाने केली आहेत. महाराष्ट्रात सध्या बोलणाऱ्यांचे दिवस आहेत. राज्य सरकारची तीन वर्षे बोलण्यात गेली, उरलेली वर्षे डोलण्यात जातील अशी घणाघाती टिका शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी केली आहे. महाराष्ट्राला व जनतेला बुलेट ट्रेनशिवाय काय मिळाले? गतिमान आणि अतिवेगवान ट्रेन देण्याचा धडाका सरकारने लावला आहे, पण लोकांना जो कामातला धडाका हवा आहे तो कुठेच दिसत नाही असा टोला आजच्या सामनाच्या अग्रलेखात लगावला आहे.

काय आहे आजच्या अग्रलेखात

एकनाथ खडसे, बबनराव लोणीकर व गिरीश बापट यांनी गेल्या चार दिवसांत गमतीशीर विधाने करून लोकांचे मनोरंजन केले आहे. खडसे यांनी शेतकऱ्यांना सल्ला दिला आहे की, ‘‘बाबांनो, तुमचं तुम्ही बघा. सरकारच्या भरवशावर राहू नका.’’ खडसे यांनी एक प्रकारे सरकारच्या कार्यक्षमतेवरच सवाल उभा केला आहे. दुसरे एक मंत्री बबनराव लोणीकर यांनी भलतेच काही तरी सांगून टाकले आहे. ‘‘मुख्यमंत्री व अर्थमंत्री विकासकामांसाठी पैसे देत नाहीत, आता मी काय करू?’’ अशी हतबलता लोणीकरांनी व्यक्त केली आहे. कन्नड तालुक्यातील पाणीपुरवठा योजना रखडल्या आहेत, त्या पूर्ण करा, लोक संतापले आहेत, असे सांगण्यासाठी कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव लोणीकरांकडे गेले व गरीब बिचाऱ्या मंत्र्यांनी स्वतःचेच रडगाणे सुरू केले. खडसे व लोणीकरांची वक्तव्ये म्हणजे राज्याच्या सद्यस्थितीचे विदारक चित्र आहे. विकासकामांसाठी पैसा नाही, असे राज्याचे एक मंत्री सांगतात, पण कर्ज काढून दिवाळी साजरी करण्याचे प्रकार काही थांबत नाहीत. अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन असेल नाहीतर समृद्धी महामार्ग, कर्जबाजारी होऊन सावकारी करण्याचा प्रकार महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या विनाशाकडे नेत आहे काय असा सवालही अग्रलेखात उपस्थित करण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांकडून विकासकामांच्या घोषणा रोज सुरू आहेत व त्या घोषणांचा पाऊस पाहिल्यावर राज्याची तिजोरी भरभरून वाहते आहे असेच वाटते, पण फडणवीस सरकारचे मंत्री मात्र काही वेगळेच सांगत आहेत. सरकारातील आणखी एक मंत्री गिरीश बापट यांनी तर नवाच फटाका फोडला. कार्यकर्त्यांना आणि जनतेला त्यांनी बजावले आहे, ‘‘काय मागायचे ते आताच मागून घ्या, नंतरचा काही भरवसा नाही. वर्षभरानंतर सरकार बदलणार आहे.’’ यावर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची सारवासारव अशी की, बापट यांच्या विधानांचा चुकीचा अर्थ काढू नका. त्यांचे वक्तव्य हे कार्यकर्त्यांत प्रेरणा आणि जोश निर्माण करण्यासाठी होते. नव्या राजवटीत मराठी भाषेचे वाप्रचार, म्हणी व शब्दांचे अर्थही बदलले जात आहेत. हे असे बोलणे म्हणजे जोश निर्माण करणारे किंवा प्रेरणादायी असेल तर विषयच संपला. बापट यापूर्वीही वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आले आहेत. आता त्यात आणखी एका वादाची भर त्यांनी टाकली. काय मागायचे असेल तर आताच मागा असे बापट म्हणतात. अर्थात मागून उपयोग नाही ही वस्तुस्थिती आहे. कारण जनता मागेल ते द्यायला सरकारकडे पैसे नाहीत. राज्याचे मुख्यमंत्री व अर्थमंत्री विकासकामांसाठी पैसेच देत नाहीत असे जर मंत्री असलेले बबनराव लोणीकरच म्हणत असतील तर मंत्र्यांचे बोलणे तरी किती मनावर घ्यायचे, हा प्रश्न निर्माण होतो. हे सरकार सत्तेत आल्यापासून प्रत्यक्ष कामापेक्षा घोषणा आणि सत्ताधाऱ्यांची वादग्रस्त विधाने यामुळेच जास्त चर्चेत राहिले आहे. आता एकनाथ खडसे, बबनराव लोणीकर आणि गिरीश बापट या आजी-माजी मंत्र्यांनीच या सरकारबद्दल विधाने केली आहेत. महाराष्ट्रात सध्या बोलणाऱ्यांचे दिवस आहेत. सरकारची तीन वर्षे बोलण्यात गेली, उरलेली वर्षे डोलण्यात जातील.

 

 

Previous articleपंकजाताई मुंडे यांचे विदर्भवासियांनी केले जोरदार स्वागत
Next articleमुलुंड मध्ये बिबट्या ; खा. सोमय्या सेल्फीत मग्न !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here