मुख्यमंत्र्यांचा साडे तीन वर्ष फक्त अभ्यास सुरु आहे
अजित पवार यांची मुख्यमंत्र्यांवर टिका
लातूर ( औसा ) : या सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना सत्तेत येवून साडेतीन वर्ष झाली तरी सरकारने एकही काम केले नाहीच शिवाय जनतेला दिलेली आश्वासनेही पूर्ण केली नाहीत. काही झाले तरी निव्वळ अभ्यास सुरु आहे यापलीकडे मुख्यमंत्री काहीच बोलत नाहीत अशी टिका अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यावर औसा येथील जाहीर सभेत केली.
आज हल्लाबोल आंदोलनाचा चौथा दिवस असून लातूर जिल्हयातील औसा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जाहीर विराट सभा पार पडली. यासभेपूर्वी भव्य मोर्चाने तहसिलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी प्रचंड गर्दी झाली होती. या सभेमध्ये अजित पवार यांना धनगर समाजाचे शिष्टमंडळ अँड. राजेश कटके आणि इतर समाजबांधवांनी आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. आदींसह लातूर जिल्हयातील पदाधिकारी, कार्यकर्ते, औसा तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
या सभेमध्ये अजित पवार यांनी पुन्हा एकदा हल्लाबोल केला. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सक्तीने वीजबिले वसुली करण्याची मोहीम घेतल्याचे कळताच अजित पवार संतप्त झाले. त्यांनी माझ्या शेतकऱ्याला त्रास देण्याची भूमिका बंद करा असा इशारा देतानाच अधिकाऱ्यांना कसली मस्ती आली आहे. कसल्या धुंदीत अधिकारी वावरत आहेत असा जाब सरकारला विचारला . आज राज्यातील लोकांना रेशनवर साखर मिळेना, रॉकेल बंद केले, गॅसचे दर वाढवले. यासाठी तुम्ही सत्तेत आलात का असा संतप्त सवाल सरकारला करतानाच सरकारला जाब विचारण्याचा लोकांना अधिकार आहे असेही पवार यांनी स्पष्ट केले.
या राज्यातील खासदारांनी काही गावे विकासकामे करण्यासाठी दत्तक घेतली परंतु त्यांना दत्तक घेतलेल्या गावांचा विकास करण्यासाठीही हे सरकार निधी देत नाही. मध्यंतरी पाणीपुरवठा मंत्री बबन लोणीकर यांनीही निधी मिळत नसल्याचेही सांगितले. सांगा कशी होणार विकासकामे असा सवालही अजित पवार यांनी केला.