लोकसभा निवडणुकीमध्ये मोदींना काँग्रेस पर्याय ठरू शकत नाही
प्रकाश आंबेडकर
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये मोदींना काँग्रेस पर्याय ठरू शकत नाही. मोदींना शह देण्याची डाव्यांना मोठी संधी आहे. डाव्यांनी पुढाकार घेतल्यास जी परिस्थिती काँग्रेसची झाली तीच परिस्थिती भाजपाची होऊ शकते. असे सांगतानाच २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत मात्र काँग्रेस भाजपाला पर्याय ठरू शकते. असा दावा भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला कर्नाटक राज्याच्या निवडणूका महत्वाच्या आहेत. कर्नाटक जिंकेल त्याचीच देशात सत्ता असेल. यामुळे दोन राज्याच्या निवडणुकीबरोबर लोकसभेच्या निवडणूका २०१९ ला न घेता त्या २०१८ च्या शेवटी घेतल्या जातील असा अंदाज आंबेडकर यांनी वर्तवला .
मुंबई मराठी पत्रकार संघाने आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे दिली . यावेळी बोलताना, राजकारणात विश्वासार्हता असावी लागते. ती २००३ नंतर निर्माण झाली. अटल बिहारी वाजपेयी त्यातील शेवटचा दुवा होते. वाजपेयी यांच्यामध्ये पक्षाच्या विरोधात सत्य मांडण्याची ताकद होती. आता सध्याच्या राजकारणात ही विश्वासार्हता दिसत नाही. राजकारण्यांकडे विकासाचा आराखडा नाही. नवीन पिढी संधी शोधण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना आरक्षणाचे कारण देऊन नाकारात्मकतेकडे नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. या नव्या पिढीतील तरुणांशी आम्ही सतत संवाद साधत होतो या संवादांमुळेच भिमा कोरेगांव प्रकरणानंतर दंगल घडवण्याची काही लोकांची इच्छा असूनही दंगल घडली नाही असे आंबेडकर म्हणाले.