महाराष्ट्राच्या जनतेचा मेक ओव्हर नीट करा
धनंजय मुंडे यांचा मुख्यमंत्र्यांना टोला
नांदेड ( लोहा ) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखणे आहेत त्यामुळे त्यांना सुंदर दिसण्यासाठी मेकअपची गरज नाही . मात्र मुख्यमंत्री म्हणून ते राज्यातील जनतेला रेटून खोटे बोलतात हे खोटे रेटून बोललेले गळून पडू नये म्हणून कदाचित त्यांच्या मेकअप वर लाखोंचा खर्च केला जात असावा .मुख्यमंत्री यांच्या मेकअप आणि चेह-यावर प्रकाश टाकण्यासाठी लाखोंचा खर्च करण्यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेचा मेक ओव्हर नीट करा असा टोला विधानपरिषद विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मराठवाड्यात सुरु असलेल्या हल्लाबोल यात्रेच्या पाचव्या दिवशी नांदेड जिल्ह्यातील लोहा येथे आयोजित भव्य मोर्चा आणि त्यानंतरच्या जाहीर सभेत मुंडे बोलत होते
“मी मुख्यमंत्री बोलतोय” या मुख्यमंत्र्यांवर चित्रीत होणा-या कार्यक्रमावर होणारा लाखोंच्या खर्चाचा मुद्दा मागील दोन दिवसापासून गाजत आहे त्याचा संदर्भ देत मुंडे यांनी टोला लगावला. मुख्यमंत्री यांच्या मेकअप आणि चेह-यावर प्रकाश टाकण्यासाठी लाखोंचा खर्च करण्यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेचा मेक ओव्हर नीट करा आणि विकास कामांवर नीट प्रकाश टाका असेही ते म्हणाले . व्यासपीठावर माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार , प्रवक्ते नवाब मलिक, चित्राताई वाघ आ. विक्रम काळे आ. सतीश चव्हाण माजी आ. शंकरअण्णा धोंडगे ज्येष्ठ नेते कमलकिशोर कदम संग्राम कोते आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
भाजप-सेनेच्या कार्यकाळात प्रत्येक घटक संपावर जातोय. कामगार, शेतकरी, डॉक्टर, बँक कर्मचारी सर्वच संपावर जातायत. या हल्लाबोल आंदोलनाच्या माध्यमातून आता या सरकारलाच संपावर पाठवावं लागेल असा इशाराही त्यांनी दिला.