भाजप नेत्यांनी त्या छिदमचा निषेधही केला नाही
धनंजय मुंडे
या सरकारचं आता करायचं काय
धनंजय मुंडेचा दिंडोरीच्या जाहीर सभेत सवाल
नाशिक ( दिंडोरी ) : छत्रपतींचे नाव घेवून सत्तेत आलेल्या भाजपच्या नेत्यांनी छ.शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द काढणाऱ्या त्या छिदमचा साधं ट्वीट करुन मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या भाजप नेत्यांनी साधा निषेधही केला नाही यावरुन त्यांची मानसिकता लक्षात येते. अशा या सरकारचं करायचं काय असा संतप्त सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिंडोरीच्या जाहीर सभेमध्ये केला.
नगरच्या उपमहापौरांनी काल छ.शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द काढले होते. त्यानंतर त्याचा राजीनामा घेतल्याचे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र महापौरांनी आपल्याकडे राजीनामा आलेला नाही असे सांगितले आहे. म्हणजे बघा हे किती खोटं बोलत आहेत.
मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते सतत सोशल मिडियावर कार्यरत असतात. परंतु ट्वीटरवर किंवा फेसबुकवर साधा निषेधही यांनी त्या छिदमचा केला नाही. एका महापुरुषाबद्दल अपशब्द वापरले जातात आणि हे भाजपवाले छत्रपतींचे नाव घेवून सत्तेत आले आणि आत्ता मात्र गप्प आहेत हा केवढा विरोधाभास असल्याचेही धनंजय मुंडे म्हणाले.
भाजपने महाराष्ट्राची घडी विस्कटवली आहे
सुनिल तटकरे
भाजप सरकारने महाराष्ट्राची घडी विस्कटवली आहे. ही घडी पुन्हा सुरळीत करण्याची जबाबदारी आपल्यावर आली असून त्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी या सभेत केले. त्यांनी या सभेमध्ये सरकारवर हल्लाबोल केला.
राज्यातील शेतकऱ्यांची जाणूनबुजुन हे सरकार हेटाळणी करत आहे. अनेक आश्वासने देत हे सरकार शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करत असून अपेक्षाहिन बनवण्याचे काम या सरकारने केला असल्याचा आरोपही सुनिल तटकरे यांनी केला.
सामाजिक बदल आणि परिवर्तन हे विचारातुन घडत असतात
खासदार सुप्रिया सुळे
सामाजिक बदल आणि परिवर्तन हे विचारातुन घडत असतात असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी दिंडोरीच्या जाहीर सभेत केले.
सुप्रिया सुळे यांनी आपल्या भाषणामध्ये त्यांनी दादा मुख्यमंत्री होणार असेल तर मला आनंदच आहे.परंतु त्यासाठी दादाच्या पाठीमागे आमदारांची ताकद आवश्यक असून ती ताकद उभी करा असे आवाहनही केले.
आता सामान्य भ्रष्टाचार होत नाहीय तर बॅंका लुटण्याचे काम सुरु झालेय
जयंत पाटील
आता सामान्य भ्रष्टाचार होत नाहीय तर बॅंका लुटण्याचे काम सुरु झाले असल्याचा आरोप माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी केला. दोन मोदी परदेशात पळून गेले आहेत आणि आता तिसरा मोदी कधी जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले. जयंत पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये ललित मोदी,नीरव मोदी यांनी कसे भ्रष्टाचार करुन परदेशात पळून गेले आहेत हे सांगत त्यांच्यावर हल्लाबोल केला.