तुम्हाला आमचे शेतकरी चोर वाटतात काय ?
धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल
जळगाव ( रावेर ) : गारपीठग्रस्त शेतीचा पंचनामा करताना शेतकऱ्यांच्या हातात पाटया देवून फोटो काढण्याचा प्रकार होत असून तुम्हाला आमचे शेतकरी चोर वाटतात काय? असा संतप्त सवाल करतानाच ही पंचनाम्याची पध्दत तात्काळ थांबवा असा इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी रावेरच्या जाहीर सभेत सरकारला दिला आहे.
मराठवाडा,विदर्भामध्ये गारपीठीने शेतकऱ्यांचे कोटयावधी रुपयांचे नुकसान झाले.शेतकऱ्यांवर आस्मानी संकट आलेले असताना शेतकऱ्यांना सरकार कोणतीच भरपाई देत नसल्याचा मुद्दा धनंजय मुंडे यांनी जाहीर सभेत उपस्थित करतानाच गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करताना तलाठी शेतकऱ्यांच्या हातामध्ये पाटी देवून फोटो काढत असल्याचे विषय लावून धरला आणि त्यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले.हे तात्काळ थांबवण्याचा इशाराही सरकारला दिला. या सभेत धनंजय मुंडे यांनी अनेक मुद्यांना हात घालत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.