अंत पाहू नका नाहीतर शेतकरीच तुमचा राजकीय अंत करतील

अंत पाहू नका नाहीतर शेतकरीच तुमचा राजकीय अंत करतील आमदार सुनिल तटकरे

मुंबई : शेतकऱ्यांचा अंत पाहू नका नाहीतर तुमचा राजकीय अंत केल्याशिवाय हा शेतकरी गप्प बसणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनिल तटकरे यांनी विधानपरिषदेमध्ये दिला.

नाशिक ते मुंबई असे शेतकऱ्यांचे लाल वादळ मुंबईच्या विधानभवनावर धडकले असून या शेतकऱ्यांच्या भावना सरकारने ऐकून घ्याव्यात आणि त्यांना योग्य तो न्याय दयावा यासाठी आज विधानपरिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनिल तटकरे यांनी पक्षाची भूमिका मांडतानाच सरकारला निर्वाणीचा इशाराही दिला.मन विषण्ण करणारा असा हा लाँग मार्च मुंबईत आला आहे. गेले दोन तीन दिवस माध्यमांनी दखल घेतल्यामुळे आमचा शेतकरीआदिवासी समाज ज्या हालअपेष्टा भोगत आहे त्या मुंबईकरांना दिसल्या. त्यामुळे मुंबईकरांच्या संवेदनाही या मोर्चामुळे जगाला दिसल्या.श्रमजीवी इतका दिर्घ प्रवास करत रक्ताळलेल्या पायांनी विधानभवनावर येत आहे हे पाहून कधीही न थांबणारी मुंबापुरी आज थांबलेली आहे.

सत्ता ही क्षणार्धात कोसळू शकते हे या लाँग मार्चमधून दिसते. कर्जमाफीच्या बाबतीत सरकारने आज-उद्याआज-उद्या करत कर्जमाफीला उशीर केला. शिवसेनेचे नेते दिवाकर रावते विरोधात असताना मराठवाड्यात अनवाणी फिरले मात्र मंत्री झालेले रावते आज शांत बसलेले आहेत. लाल झेंडा हातात घेवून आलेले हे शेतकरी,आदिवासी संख्येने कमी असले तरी त्यांची उपेक्षा करु नका.

अंत्योदय योजनाअन्न सुरक्षा योजनासंजय गांधी निराधार योजना या आघाडी सरकारच्या काळात सुरु केल्या होत्या. आज या योजनांची बिकट अवस्था आहे. या योजना पुन्हा कार्यान्वित कराअशी त्यांची मागणी आहे. नार-पारचे गुजरातला जाणारे पाणी खान्देशातील आदिवासींना मिळावे ही देखील त्यांची मागणी आहे.निरभ्र आकाशाकडे पाहत लाल बावटा घेतलेल्या लाँग मार्च कसारा घाटातून चालत असलेले विहंगम चित्र जेव्हा सोशल मिडियावर वायरल झाले तेव्हा सरकार खडबडून जागे झाले. त्यांना वाटले होते शे-पाचशे जणच मुंबईत पोहोचतील. चार-दोन कॉम्रेड भेटायला येतील. पण या आंधळ्या सरकारचे डोळे उघडणारा हा लॉंग मार्च आहे असेही तटकरे म्हणाले.

शिवसेना व कम्युनिस्ट पक्षाचे वैचारिक मतभेद असतील. पण जेव्हा कष्टकऱ्यांचा विषय येतो तेव्हा सर्व पक्षांनी एकत्र येवून एक भूमिका घ्यायला हवी. एखाद्याला एकदा फसवता येईल. मात्र सदा सर्वकाळ सर्वांना फसवता येत नाही. सरकारने या मोर्चाच्या माध्यमातून आपल्या संवेदना जाग्या कराव्यात असा सल्लाही दिला. वन जमिन संपादित करण्यासाठी सरकारने इच्छाशक्ती दाखवावी. सर्व अधिकारी एकत्र बसवून निर्णय घ्यावा असेही तटकरे म्हणाले.

Previous articleलाँग मार्चच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर सरकार भस्मसात होईल!
Next articleमुख्यमंत्र्यांना मोर्चाची ताकद बघून धडकी भरली आहे 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here