मुख्यमंत्र्यांना मोर्चाची ताकद बघून धडकी भरली आहे
धनंजय मुंडे
मुंबई : शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या ‘सुकाणु’ समितीला ‘जीवाणू’ म्हणून हिणवणाऱ्या मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांची ताकद, निर्धार बघून आता धडकी भरली आहे. दिडशे किलोमीटरचं अंतर अनवाणी, रक्तबंबाळ पायानं तुडवत आलेल्या शेतकरी, आदिवासी बायाबापड्यांना हे सरकार आता फसवू शकणार नाही, आंदोलक शेतकरी प्रसंगी अन्नपाण्यावीना राहतील परंतु सरकारविरोधातला संघर्ष आता थांबणार नाही, असा निर्धार विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज आझाद मैदान येथे शेतकरी मोर्चासमोर आणि विधान परिषदेत बोलताना व्यक्त केला.
धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आझाद मैदान येथे जावून मोर्चेकरी शेतकरी बांधवांची भेट घेतली. शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा मोर्चाला आणि त्यांच्या मागण्यांना संपूर्ण पाठींबा जाहीर केला. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून लढेल तसंच विधीमंडळातही राष्ट्रवादी काँग्रेस हा मुद्दा आक्रमकपणे मांडेल, असा विश्वासही मुंडे यांनी आंदोलक शेतकऱ्यांना दिला.
संपूर्ण कर्जमाफी, कसणाऱ्याच्या नावावर जमीन, शेतीमालाला हमीभाव आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची तातडीने अंमलबजावणीची मागणी मोर्चेकरी शेतकऱ्यांनी केली आहे. या मागण्या अवास्तव नाहीत तर न्याय्य मागण्या असून त्या सरकारला मान्य कराव्याच लागतील, असा इशाराही मुंडे यांनी दिला. मोर्चाच्या आधल्या रात्री मुख्यमंत्र्यांच्या निर्देशावरुन मंत्र्यांनी केलेली धावपळ ही ‘नौटंकी’ असून शेतकरी आता असल्या नौटंकीला फसणार नाही. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होऊन न्याय मिळेपर्यंत आता शेतकरी आणि आमच्यापैकी कुणीही स्वस्थ बसणार नाही, असेही मुंडे यांनी सांगितले.
विधान परिषदेत कामकाज सुरु होताच धनंजय मुंडे यांनी हा विषय मांडून सरकारचे लक्ष वेधले. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आ. हेमंत टकले, आ. भाई जगताप, आ. जयंत पाटील, आ. कपिल पाटील, आ. जयवंत जाधव यांनीही भावना मांडल्या.