नाणार प्रकल्पाच्या अधिसूचनेवरून युतीत मिठाचा खडा !
मुंबई : वादग्रस्त नाणार प्रकरणावरून युतीमध्ये वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज नाणार प्रकल्पासाठीच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द केल्याची घोषणा केली असतानाच मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणार प्रकल्पाच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्यात आली नसल्याचे सांगितले आहे.
आधी नाणारची अधिसूचना रद्द करण्याची मागणी स्थानिकांनी केली असता राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज नाणारच्या सभेत नाणार प्रकल्पासाठीच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द केल्याची घोषणा केली मात्र या घोषणेला काही तास होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणार प्रकल्पाच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्यात आली नसल्याचे स्पष्ट केल्याने युतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.आता यावर शिवसेना कोणता निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज नाणार भागाला भेट दिली. त्यावेळी झालेल्या सभेत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नाणार प्रकल्पासाठीच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्यात आल्याची घोषणा केली.
या निर्णयावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, नाणार प्रकल्पासाठीच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याची घोषणा ही उद्योगमंत्री देसाई यांचे वैयक्तिक मत असून, ही अधिसूचना रद्द करण्यात आलेली नाही.अधिसूचना रद्द करण्याचा अधिकार हा मुख्य सचिव समितीला असतो. सध्या तरी अधिसूचना रद्द करण्यासंदर्भात कोणताही प्रस्ताव आलेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नाणार प्रकल्पासंदर्भात राज्य आणि कोकणच्या हिताचा विचार करून योग्य निर्णय घेतला जाईल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
सागवे-कात्रादेवी येथिल नाणार मध्ये आयोजित केलेल्या सभेत शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी नाणार प्रश्नी सरकारवर जोरदार हल्ला चढविला. नाणारमध्ये कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प होऊ देणार नाही असे त्यांनी जाहीर केले.