शिवसेनेने अमित शहांना झणझणीत वडापावचा ठसका द्यायला हवा होता : विखे पाटील

शिवसेनेने अमित शहांना झणझणीत वडापावचा ठसका द्यायला हवा होता : विखे पाटील

मुंबई : भाजपने केलेल्या देशाच्या फसवणुकीसाठी शिवसेनेने भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना झणझणीत वडापावचा ठसका द्यायला हवा होता अशी टीका विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

भाजपने मागील चार वर्ष देशाची सतत दिशाभूलच केली आहे. शिवसेनेनेही त्यावर वारंवार अत्यंत कठोर भाषेत टीका केली. भाजपने केलेल्या देशाच्या फसवणुकीसाठी शिवसेनेने अमित शहा यांना झणझणीत वडापावचा ठसका द्यायला हवा होता. पण त्याऐवजी त्यांनी ढोकळा, खांडवी  गाठिया हाती घेऊन भाजप नेत्यांच्या स्वागताला उभे रहावे, हा महाराष्ट्राचा मोठा अवमान असून, तो शिवराज्याभिषेक दिनाच्या दिवशी व्हावा, हे सर्वात मोठे दुर्दैव आहे. या अवमानानंतर शिवसेनेला भाजपवर टीका करण्याचा कोणताही नैतिक अधिकार राहिलेला नाही, असेही  विखे पाटील यांनी सांगितले.

मागील चार वर्ष विरोधी पक्षांनी संपूर्ण देशात भाजप व शिवसेना सरकारविरूद्ध रान पेटवले आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांना धडकी भरली असून, चार वर्ष एकमेकांवर प्रचंड टीका केल्यानंतर एकत्र येण्यासाठी केविलवाणी धडपड करतात, हा विरोधी पक्षांचा मोठा विजय आहे. सरकारच्या मनात विरोधी पक्षांबद्दल धास्ती असल्यामुळेच अमित शहांच्या दौऱ्यात काँग्रेसने आंदोलन करू नये म्हणून मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांना सकाळपासून नजरकैदेत ठेवण्यात आले. पण खरे तर राज्य सरकारने निरूपम यांच्याऐवजी उद्धव ठाकरेंना नजरकैदेत ठेवायला हवे होते. कारण संजय निरूपम यांनी फार तर अमित शहांसमोर निदर्शने केली असती. शिवसेनेसारखे 4 वर्ष सरकारमध्ये मांडीला मांडी लावून बसल्यानंतरही वेळोवेळी पाठीत खंजीर खुपसला नसता. भाजपला पाठीमागून वार करण्याचा खरा धोका शिवसेनेकडून असल्याने सरकारने निरूपमांना नव्हे तर उद्धव ठाकरेंना नजरकैद करायला हवे होते. पण त्याऐवजी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष मातोश्रीवर नजराणा पेश करायला गेले, असा घणाघात विरोधी पक्षनेते  विखे पाटील यांनी केला.

Previous articleशिवसेनेचे उमेदवार शिवाजी शेंडगेंचा उमेदवारी अर्ज दाखल
Next articleमातोश्रीवर शहा-उध्दव भेटीत शिवसेनेची किंमत किती ठरली