पवारांनी देशाचे राजकारण करावे, द्वेषाचे नाही : मुख्यमंत्री
मुंबई : धमकीचे पत्र म्हणजे जनतेची सहानुभूती मिळवण्याचा प्रकार असल्याची टीका करणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वक्तव्याचा समाचार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असून,पवारांनी देशाचे राजकारण करावे, द्वेषाचे नाही असा टोला त्यांनी लगावला आहे.
धमकीचे पत्र आल्यावर कोणी प्रसार माध्यमांशी बोलत नाही तर कायदेशीर कारवाई केली जाते. त्यामुळे ही धमकी खरीच आहे का असा सवाल उपस्थित करीत, धमकीच्या पत्रावरून जनतेची सहानुभूती मिळवण्याचा हा प्रकार आहे अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष वरद पवार यांनी हल्लाबोल यात्रेच्या समारोपाच्या सभेत केली होती. त्यांच्या या टीकेला मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचण्या संदर्भातील पत्राबाबत शंका उपस्थित करणारे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे हे वक्तव्य दुदैवी असून,पंतप्रधान हे पक्षाचे नाही तर देशाचे नेते असतात, पवार यांनी देशाचे राजकारण करावे, द्वेषाचे नाही असा टोला लगावतानाच, पोलीसांकडे सर्व पुरावे आहेत.सत्य बाहेर येईलच असे ट्विट परदेश दौ-यावर असण-या मुख्यमंत्र्यांनी करून पवार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.










