मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या सुरक्षेत आणखी वाढ करा: उद्धव ठाकरे
मुंबई: लाख मेले तरी चालतील, पण लाखांचे पोशिंदे जगलेच पाहिजेत असे म्हणत मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्या सुरक्षेत आणखी वाढ करावी अशी मागणी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून केली आहे.
मोदी आणि फडणवीस यांना उदंड निरोगी दीर्घायुष्य चिंतीत आहोत असे या संपादकीय लेखात म्हटले आहे. पोलिसांनी भीमा–कोरेगाव दंगलीच्या सूत्रधारांना आता अटक केली व हे सर्व लोक विध्वंसक विचारांचे नक्षलवादी आहेत. हेच लोक मोदी,फडणवीसांना मारण्याचा कट रचत होते. हे सगळे रोमांचक तितकेच थरारक आहे. अर्थात या कथानकात काही कच्चे दुवे आहेत. त्यामुळे विरोधकांना टीकेस वाव मिळाला आहे असे नमूद करतानाच पंतप्रधानांची सुरक्षा आहे त्यापेक्षा जास्त मजबूत करता येईल काय व मुख्यमंत्री फडणवीसांना ‘मोसाद’च्या धर्तीची सुरक्षा व्यवस्था पुरवता येईल काय यावर गांभीर्याने विचार करावाच लागेल. कारण पुन्हा तेच. लाख मेले तरी चालतील(तसे ते मरतच आहेत), पण लाखांचे पोशिंदे जगलेच पाहिजेत अशी मागणी सामनाच्या अग्रलेखातून केली आहे.










