ही तर लाखो ऊसतोड कामगारांची फसवणूक आणि स्व. मुंडे साहेबांचा अवमान – धनंजय मुंडे

ही तर लाखो ऊसतोड कामगारांची फसवणूक आणि स्व. मुंडे साहेबांचा अवमान – धनंजय मुंडे

स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ सरकारने गुंडाळले

मुंबई : स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाची केवळ घोषणा करून ते सुरुवात करण्याआधीच गुंडाळणे हा केवळ राज्यातील लाखो ऊसतोड कामगारांचाच नव्हे तर स्व. गोपीनाथराव मुंडे साहेबांचाही सरकारने अवमान केला आहे फसवणूक केली आहे अशा शब्दात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

साधारण साडेतीन वर्षांपूर्वी सरकारने स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या नावे ऊसतोड कामगार महामंडळ सुरू करण्याची व त्याचे कार्यालय परळी येथे करण्याची घोषणा केली होती. स्वतः खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पांगरी ( परळी ) येथील स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधी स्थळी त्यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात ( सन २०१४) ही घोषणा केली होती. मात्र ३ वर्ष महामंडळ स्थापन करण्याबाबत काहीच कारवाई केली नाही. धनंजय मुंडे यांनी वारंवार हा प्रश्न सभागृहात उपस्थित केला होता. नुकत्याच झालेल्या मार्च अधिवेशनात ही त्यांनी या प्रश्नावर सरकारला धारेवर धरले होते तेंव्हा कामगारमंत्री संभाजी पाटील यांनी एक महिन्याच्या आत हे महामंडळ व कार्यालय सुरू करू असे आश्वासन दिले होते मात्र तीन महिने होऊनही त्यावर काहीच कारवाई झाली नाही. उलट आता हे महामंडळच सुरू होण्याआधी गुंडाळन्याचे सरकारने ठरवले आहे.

त्यावर धनंजय मुंडे यांनी अतिशय संतप्त होत सरकारने ही केवळ लाखो ऊसतोड कामगारांची फसवणूकच नव्हे तर स्व. मुंडे साहेबांचाही अवमान केला असल्याचे म्हटले आहे. सरकारने मराठा , धनगर अशा सर्वच समाज घटकांची फसवणूक केली आहे. ज्या स्व. मुंडे साहेब यांनी भाजपाची उभारणी केली पक्षाला सत्ता मिळवून दिली त्यांच्या प्रेमाखातर लाखो ऊसतोड कामगारांनी सातत्याने भाजपला साथ दिली त्या सर्वांचा सरकारने विश्वासघात आणि फसवणूक केल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे.

Previous articleमंत्रालयासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न
Next articleजाती-पातीचे वाढते राजकारण चिंतेची बाब –  पंकजा मुंडे