पेन्शन देण्याच्या निर्णयावर शिवसेनेने भूमिका स्पष्ट करावी
नवाब मलिक यांची मागणी
मुंबई : आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगणाऱ्यांना पेंन्शन देण्याच्या सरकारच्या निर्णयाच्यावेळी शिवसेनेची काय भूमिका होती आणि या प्रस्तावाला शिवसेनेचा विरोध होता की पाठिंबा दिला.जर याला शिवसेनेने पाठिंबा दिला तर बाळासाहेबांची भूमिका चुकीची होती हे शिवसेनेने स्पष्ट केले पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केली.
सरकारने आणीबाणीमध्ये मिसा कायद्याअंतर्गत ज्यांनी तुरुंगवास भोगला अशांना दहा हजार पेन्शन देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेत असताना शिवसेनेची भूमिका काय होती हे शिवसेनेने स्पष्ट करावे. आणीबाणीच्या काळात शिवसनेने ही आणीबाणी गरजेची आहे,आणीबाणी चांगली होती अशी भूमिका घेत आणीबाणीच्या बाजुने उभे राहण्याचे काम केले होते. आता पेन्शन देण्याचा निर्णय सरकार घेत असताना बाळासाहेबांनी आणीबाणीचे समर्थन केले होते ते चुकीचे होते काय हे शिवसेनेने स्पष्ट करावे अशी मागणी मलिक यांनी केली.
हा निर्णय देशातील स्वातंत्र्य चळवळीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेचा सहभाग नसताना तरुण पिढीला या संघटनेनेही काही तरी देशासाठी केले आहे. त्याचा एक पुरावा तयार करुन ज्या स्वातंत्र्यसेनानीला जी पेंन्शन मिळते तशीच पेंन्शन यांना देवून उंगली कटा के शहिदोंमें नाम लिखाना, म्हणजे माझे बोट गेले त्यामुळे मी ही शहीद झालो असे कुठे तरी काम या सरकारच्या माध्यमातून सुरु झालेले आहे असा आरोपही मलिक यांनी केला.
मिसा कायद्याअंतर्गत ज्यांना अटक करण्यात आली होती त्या सर्वांना तुम्ही पेंन्शन देणार आहात का असा सवाल मलिक यांनी करून, त्या काळामध्ये मिसाअंतर्गत हाजी मस्तान, मिर्झा हे तुरूंगात गेले होते. सुकूर नारायण बाखिया या स्मगलरही तुरूमगात गेले होते. मग हा निर्णय घेत असताना ज्यांनी मिसामध्ये तुरूंगवास भोगला त्यांच्यावर मिसा लागल्यानंतर सगळे आता स्वातंत्र्यसेनानी होणार आहेत का असा सवाल मलिक यांनी करून स्वातंत्र्यसेनानी ठरवत असताना स्मगलरांना पण स्वातंत्र्यसेनानी करणार का याचा खुलासा सरकारने केला पाहिजे अशी मागणीही मलिक यांनी केली.










