कंठशोष करणारे वाचाळवीर आता कुठे आहेत?

कंठशोष करणारे वाचाळवीर आता कुठे आहेत?

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे

मुंबई : एरवी पावसामुळे मुंबईच्या केवळ सखल भागात वीतभर पाणी साचले तरी ‘मुंबई बुडाली हो’ असा बेंबीच्या देठापासून कंठशोष करणारे वाचाळवीर आता कुठे आहेत? अशा शब्दात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर सामनाच्या अग्रलेखातून निशाना साधला आहे.

काल नागपूरमध्ये झालेल्या पावसामुळे विधिमंडळाचे दिवसभराचे कामकाज स्थगित करावे लागल्याने राज्य सरकारवर चहूबाजूंनी टीका होत आहे.शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. कालच्या पावसाने नागपूर शहराची पूर्णतः दैना उडवली. नागपूर ही मुख्यमंत्र्यांची कर्मभूमी, पण संपूर्ण नागपूर पावसाने जलमय झाले. आमदार निवास, मंत्र्यांचे बंगले, वीज उपकेंद्रे सारे काही पाण्यात गेले. हे पाहून मुख्यमंत्रीही व्यथित झाले असणार, असे आजच्या अग्रलेखात म्हटले आहे.

काय आहे अग्रलेखात

मुसळधार पावसाने नागपूर शहराची दाणादाणच नव्हे तर दैना उडवली आहे. नागपुरात सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाच्या निमित्ताने राज्याचे संपूर्ण सरकारच नागपुरात आले आहे. तथापि, विधान भवनातच पाणी शिरल्याने विधिमंडळाचे अधिवेशनच दिवसभरासाठी स्थगित करण्याची भयंकर नामुष्की सरकारवर ओढवली. दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कर्मभूमी असलेले नागपूर काही तासांच्या पावसाने जलमय झाले. आमदार निवास, मंत्र्यांचे बंगले, वीज उपकेंद्रे सारे काही पाण्यात आहे. अधिवेशनासाठी आलेले अधिकारी, कर्मचारी आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचेही अतोनात हाल झाले. आपल्या डोळ्यासमोर शहरात पाणी भरते आहे, रस्त्यांचे रूपांतर नद्यांमध्ये होत आहे, हे पाहून मुख्यमंत्रीही नक्कीच व्यथित झाले असणार. ‘विकास पुरुष’ अशी ओळख असलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे हे शहर. आपल्या लाडक्या शहराची आज जी अवस्था झाली ती बघून धडाकेबाज गडकरींनाही निःसंशय वेदना झाल्या असणारच.

Previous articleनागपूरातील पावसाळी अधिवेशन बालहट्टापायी: अजित पवार
Next article१६ जुलै पासून मुंबईत दुधाचा एक थेंबही येऊ देणार नाही