सत्ताधारी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला उध्वस्त करण्याच्या मार्गावर : शरद पवार
मुंबई : देशात जातीयवादाच्या घटना वाढल्याची खंत व्यक्त करतानाच, देशात अनेक ठिकाणी अफवांवरून हत्या घडत असून, मागासवर्गीय व अल्पसंख्याक समाजाला दडपशाहीतच ठेवण्याचा सत्ताधाऱ्यांचा मानस दिसून येत आहे. सत्ताधारी पक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेला बदलण्याचा किंबहुना उध्वस्त करण्याच्या मार्गावर असल्याची टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या जनतेचा भ्रमनिरास केला असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन शिबीर मुंबईत आयोजित करण्यात आले होते. या शिबीरात मार्गदर्शन करताना त्यांनी ही टीका केली. देशातील जनतेने नरेंद्र मोदी यांच्या बाजूने कौल दिला. मोदी हे देशाचे चित्र बदलतील अशी अपेक्षा जनतेला होती मात्र जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात पंतप्रधान मोदी अपयशी ठरले असेही पवार आपल्या भाषणात म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबईच्या कार्यक्रमास मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहून आनंद वाटला असल्याचे मत शरद पवार यांनी व्यक्त केले. देशात जातीयवादाच्या घटना वाढल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. देशात अनेक ठिकाणी अफवांवरून हत्या घडत आहेत. मागासवर्गीय व अल्पसंख्याक समाजाला दडपशाहीतच ठेवण्याचा सत्ताधाऱ्यांचा मानस दिसून येतो. हा सत्ताधारी पक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेला बदलण्याचा किंबहुना उध्वस्त करण्याच्या मार्गावर असल्याची टीका त्यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता हा जमेल ती किंमत मोजायला तयार आहे पण देशाच्या राज्य घटनेवर गदा आणू देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात आले होते की आपण देश घडवून दाखवू. यासाठी त्यांनी जी निती वापरली त्यात सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आपल्या देशाचा रुपया घसरला, याचा अर्थ आपल्या देशाचा अर्थसंकल्प ढासळला आहे. टीका आम्ही पक्षावर करत नसून त्यांच्या कार्यप्रणालीवर करत असल्याचेही ते म्हणाले. पंतप्रधानांनी त्यांच्या दौऱ्यादरम्यान देशाचे प्रतिनिधित्व न करता राजकारणातून विरोधी पक्षावर टीका केली. म्हणूनच कालच्या संसदेत काँग्रेस अध्यक्षांनी पंतप्रधानांना दाखवून दिले की आम्ही तुमच्याबद्दल वाईट चिंतन करीत नाही. संविधानावर गदा आणण्याचे काम सत्ताधारी पक्ष करीत आहे याला धडा शिकवण्याचे काम हे सामान्य माणूसच करू शकेल. लोकशाहीवर अन्याय करणाऱ्या, संविधानाला दुबळा करणाऱ्या अशा लोकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष धडा शिकवेल असा इशारा यावेळी पवार दिला.
सरकारच्या चार वर्षांच्या कारभाराबद्दल सर्वच जाती-धर्मातील आणि सर्व स्तरातील लोकांमध्ये एक असमाधानाची भावना आहे. नरेंद्र मोदी यांच्या बद्दलची लोकभावना बदलायला लागली आहे. आता मोदी सरकारच्या चुका लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम आपण अत्यंत गांभीर्याने करायला हव असे मत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मांडले. भाजपचे संख्याबळ जास्त असले तरिही लोकसभेत अविश्वासदर्शक ठराव सरकारविरुद्ध मांडण्यात आला आणि सरकारच्या चार वर्षांच्या कार्यकालात झालेल्या चुकांचा लेखाजोखाच त्यातून मांडला गेला. कार्यकर्त्यांनी सत्ता परिवर्तनात आपण मोठा बदल घडवू शकतो, हा आत्मविश्वास ठेवायला हवा असे ते म्हणाले. भाजपचे मित्रपक्ष असलेल्या काही पक्षांनी फारकत घेतली तर काही नाराज आहेत. अनेक पक्ष सरकारच्या विरोधात बोलायला लागले आहेत. त्यामुळे जी आघाडी उत्तम, ज्यांची बांधणी उत्तम ते पुढील काळात सत्तेत येण्याची शक्यता असल्याचा दावा करत त्यांनी प्रोत्साहित केलं. सरकारचे अपयश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीनिशी रस्त्यांवर उतरण्याचा सल्ला त्यांनी दिला.
या मार्गदर्शन शिबिरास खा. शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रीय महिला प्रदेशअध्यक्ष्य फौजिया खान, विधिमंडळ पक्षनेता अजितदादा पवार, आमदार छगन भुजबळ, उपाध्यक्ष नवाब मलिक, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, आमदार किरण पावसकर, आमदार विद्या चव्हाण, महिला प्रदेशअध्यक्ष्य चित्रा वाघ, कोषाध्यक्ष हेमंत टकले, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, व इतर अनेक पदाधिकारी उपस्थित होते.