आंदोलकांवरील गुन्हे मागे : मुख्यमंत्री

आंदोलकांवरील गुन्हे मागे : मुख्यमंत्री

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनावेळी अनेक आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे गुन्हे मागे घेतल्याची माहिती  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. मागास आयोगाचा अहवाल एक महिन्यात प्राप्त होणार आहे.त्यानंतर आरक्षणाबाबतच्या सर्व वैधानिक बाबी तपासून त्याबाबत विशेष अधिवेशनात चर्चा होवून, आरक्षणावर निर्णय होईल असेही त्यांनी बैठकीनंतर स्पष्ट केले.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहावर आंदोलकांसोबत चर्चा केली. या बैठकीला भाजपचे खासदार नारायण राणे आणि काँग्रेस आमदार नितेश राणे उपस्थित होते.आज सह्याद्रीवर मुख्यमंत्र्यांसोबत ज्यांची बैठक झाली, त्यांच्याशी आमचा कसलाही संबंध नाही, असे मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आज झालेल्या बैठकीला कोणते आंदोलक उपस्थितीत होते, याबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात आली.

राज्यात ठिकठिकाणी झालेल्या मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणांवरील गुन्हे मागे घेण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली. मात्र पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचेही  त्यांनी स्पष्ट केले. मराठा आरक्षणाबाबत मागास आयोग सर्व बाबी तपासून पाहत आहे. येत्या महिनाभरात या आयोगाचा अहवाल प्राप्त होणार आहे. त्यानंतर आरक्षणाबाबतच्या सर्व वैधानिक बाबी तपासण्यात येवून त्यावर विशेष अधिवेशनात चर्चा करण्यात येणार असल्याने सकल मराठा समाजाने राज्यात शांतता राखावी, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले आहे.

Previous articleमराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर उद्या शिवसेनेच्या आमदारांची बैठक
Next articleभरतीमध्ये मराठा समाजातील तरूणांवर अन्याय होऊ देणार नाही