जनतेतील प्रचंड असंतोषामुळे मुख्यमंत्री राज्यात फिरू शकत नाहीत
अशोक चव्हाण यांची टीका
इचलकरंजी : राज्याचा मुख्यमंत्र्यांना आषाढीला विठ्ठलाच्या महापूजेला पंढरपूरला जाता येत नाही असे सांगतानाच एवढी वाईट वेळ कधी महाराष्ट्रावर आली नव्हती.जनतेमध्ये प्रचंड असंतोष असल्यामुळे मुख्यमंत्री राज्यात फिरू शकत नाहीत अशी टीका काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी अशोक चव्हाण यांनी इचलकरंजी येथिल जनसंघर्ष सभेत केली.
काॅग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचे आगमन इंचलकरंजी येथे झाले असता येथिल सभेत अशोक चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारवर हल्लाबोल केला. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आषाढीला विठ्ठलाच्या महापूजेला पंढरपूरला जाता येत नाही. एवढी वाईट वेळ कधी महाराष्ट्रावर आली नव्हती.लोकांमध्ये प्रचंड असंतोष असल्यामुळेच मुख्यमंत्री राज्यात फिरू शकत नसल्याची टीका त्यांनी केली.
लोकांमध्ये जाऊन मते मागायला तोंड राहिले नाही म्हणून आता जाती जातीत भांडणे लावण्याचा प्रयत्न सुरु आहे असा आरोप करून या विखारी शक्तींना दूर करा असे आवाहन खा.चव्हाण यांनी केले. घनकच-याचे व्यवस्थापन सरकार करत नाही. म्हणून सर्वोच्च न्यायालयाने दंड ठोठावला असे सांगत सरकारने गावासोबत शहरेही बकाल केली.स्टार्टअप इंडीया, स्टॅण्ड अप सारख्या घोषणा देण्यापलिकडे काहीही केले नाही त्यामुळे इंडिया उपाशी झाला आहे. त्यामुळे आता जनता म्हणतेय मोदीजी हे सगळे वाईण्ड अप करा असा टोलाही चव्हाण यांनी लगावला.