पावसाने जरी पाठ फिरवली, तरी मी आणि माझे सरकार तुमच्या पाठिशी:पंकजा मुंडे
परळी : पावसाने जरी पाठ फिरवली तरी मी आणि माझे सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असुन मदतीला सदैव तत्पर आहोत, शेतकर्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी शासन वचनबध्द आहे ‘ अशा शब्दात राज्याच्या ग्रामविकास, महिला व बालविकास मंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी आज थेट शेतकर्यांच्या बांधावर जावून दिलासा दिला. पालकमंत्री थेट बांधावर आल्याने शेतकर्यांच्या चेह-यांवर समाधानाची छटा दिसून आली.
बीड जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाल्याने भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी शेतीतील उभी पिके वाळुन गेली आहेत. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी आणि त्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी पंकजा मुंडे यांनी आज परळी तालुक्यातील दगडवाडी येथील प्रभाकर यमगर व मंचकराव यमगर यांच्या टोकवाडी येथील शेतकरी वैजनाथ भांगे यांच्याही शेतात जावून कापूस आणि इतर पीकांची पाहणी केली.
शेतक-यांनी मांडल्या व्यथा
पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी प्रत्यक्ष बांधावर जावून पीक परिस्थितीची पाहणी केल्याने शेतक-यांच्या आशा पल्लवित झाल्या. ताई, आता तुम्हीच आमचे माय-बाप आहात अशा शब्दांत त्यांनी व्यथा मांडल्या. पंकजा मुंडे यांनी अतिशय आस्थेने विचारपूस करत त्यांना मदतीसाठी आश्वस्त केले. यंदा भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. चांगली पीके येवून शेतकरी सुजलाम सुफलाम होईल असे वाटत होते. मात्र, निसर्गाने मध्यंतरीच साथ सोडून दिली. पावसाने दडी मारल्यामुळे पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कापसासह इतर पीके उध्दवस्त झाली आहेत असे सांगुन या परिस्थितीत शेतकर्यांनी धीर सोडू नये असे आवाहन करून पाऊस पाडू शकत नसले तरी शेतकर्यांना मात्र मदत करण्यास मी सदैव तयार आहे. शेतकर्यांच्या आर्थिक नुकसानाची भरपाई करून देण्यासाठी मी केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा करून मदत मिळवून देईल असा शब्द पंकजा मुंडे यांनी दिला.
तडोळी येथील शेतकरी माणिकराव सातभाई यांच्या शेतात भेट देवून ऊसाला लागलेल्या उन्नी आळीची पाहणी केली. यामुळे उभा ऊस वाळुन जावू लागला आहे. या अळीच्या प्रार्दूभावाने मोठे नुकसान होत आहे. या शेतकर्यांनाही दिलासा देण्यासाठी शासन व मी कटीबध्द आहोत असा शब्द त्यांनी दिला. ना.पंकजाताई मुंडे या दुष्काळाची पाहणी करण्यासाठी थेट शेतकर्यांच्या बांधावर गेल्याने शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ताईसाहेब आता तुमचाच आधार
पाऊस न झाल्याने सर्व पीके हातची गेली आहेत. भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. निसर्गाने आणि काळ्या आईने साथ सोडली आहे. त्यामुळे ताईसाहेब आता तुमचाच आम्हांला आधार आहे. आता माझ्या नातीचे लग्न असुन त्यासाठी आर्थिक मदतीची गरज लागणार आहे. ताईसाहेब शासन दरबारी आमची व्यथा मांडून आमच्या पदरात जास्तीत जास्त मदत मिळवून द्या अशी भावना टोकवाडीचे शेतकरी वैजनाथ भांगे यांनी व्यक्त केली. यावर ना.पंकजाताई मुंडे यांनी तुम्ही कांहीही काळजी करू नका, मी आहे तुमच्यासोबत अशा शब्दात दिलासा दिला.
यावेळी उपविभागीय अधिकारी गणेश महाडीक, तहसीलदार झाडगे, गटविकास अधिकारी लोखंडे, कृषी अधिकारी सोनवणे यांच्यासह भाजपचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव गुट्टे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्रीहरी मुंडे, राजेश गित्ते, रवि कांदे, प्रा. बिभीषण फड, पं.स.सदस्य भरत सोनवणे, सौ. गोदावरी मुंडे, रमेश मुंडे, मारुती मुंडे गुरुजी, मारोती फड, भीमराव मुंडे, दिलीप बिडगर, संभाजी सातभाई, सुरेश माने, चंद्रकांत देवकते, गोपीनाथ गित्ते, संतोष सोळंके, सुग्रीव मुंडे, संजय मुंडे, गणेश होळंबे, अक्षय मुंडे यांच्यासह असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.