उपसमिती आता करताय तर पाच दिवसांत मराठा आरक्षण कसे देणार ?: मुंडे
मुंबई : मराठा आरक्षणाबाबत मंत्रीमंडळाची उपसमिती स्थापन करण्याचा शासन आदेश गुरूवार दि.२२ नोव्हेंबर, २०१८ रोजी सायंकाळी शासनाने काढला. उद्या पासून ३ दिवस शासकीय सुट्या आहेत, आणि अधिवेशनाचे आता केवळ ५ दिवस शिल्लक आहेत. या ५ दिवसात हि समिती तज्ञांना, विधिज्ञांना केंव्हा आमंत्रित करणार ? अभ्यास करून सर्व वैधानिक कार्यवाही कधी पुर्ण करणार ? आणि कायदा करून दि.२ डिसेंबरच्या आत आरक्षणाचा निर्णय केंव्हा घेणार ? असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.
मुख्यमंत्र्यांची दि १ डिसेंबरला जल्लोष करण्याची घोषणा त्यामुळे फसवणुकच ठरेल की काय ? अशी भिती ही श्री.मुंडे यांनी व्यक्त केली आहे. राज्य मागास आयोगाकडून मराठा आरक्षणाबाबत सरकारला दि. १५ नोव्हेंबर रोजी अहवाल सोपवल्यानंतर दि.१८ नोव्हेंबर रोजी शासनाने तो मंत्रीमंडळ बैठकीत सादर करून त्यातील खंड ३ मधील अंतिम शिफारशी पुर्ण स्वीकारून त्यापुढील सर्व वैधानिक कार्यवाही करण्यासाठी मंत्रीमंडळ उपसमिती गठीत केली आहे. या समितीच्या नियुक्ती संबंधीचा शासन आदेश आज सायंकाळी ५ वाजता काढण्यात आला. त्यावर मुंडे यांनी एक ट्विट करून ५ दिवसात हि उपसमिती वैधानिक कार्यवाही कशी पुर्ण करेल ? आणि दि.३० नोव्हेंबरला संपणाऱ्या अधिवेशनापुर्वी कायदा करून आरक्षण कसे देणार आहे ? असा प्रश्न उपस्थित केला आहे. सरकारची यातून अनास्थाच दिसत असल्याचा आरोपही त्यांनी केला.