विरोधक आक्रमक झाल्यानेच सरकारकडून सूडबुद्धीचे राजकारण : मुंडे
मुंबई: सिंचन घोटाळ्याला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार जबाबदार नाहीत. ज्या फायली समोर आल्या त्यावर त्यांनी सह्या केल्या. एसीबीने सादर केलेल्या शपथपत्रात कुठेही अजित पवारांवर ठपका ठेवलेला नाही, अशा शब्दांत विधान परिषदेतील विरोधी नेते धनंजय मुंडे यांनी पवारांची पाठराखण केली. तसेच विरोधक आक्रमक झाल्यानेच सरकार सूडबुद्धीचे राजकारण करत असल्याचा हल्लाही त्यांनी चढवला.
शपथपत्रात पवारांवर कुठेही ठपका ठेवलेला नाही. सचिवांनी ज्या फायली समोर ठेवल्या त्यावर पवारांनी सह्या केल्या. त्यांनी कुठेही नियम डावलून मंजुरी दिलेली नाही. शपथपत्राचा चुकीचा अर्थ काढला गेल्याचा आरोप मुंडे यांनी केला. माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
मुंडे यांनी माध्यमांनाही दोष देताना म्हटले की, त्यांनीही शपथपत्राचा गैर अर्थ काढला आहे. गेल्या वेळेसही माध्यमांनी अजित पवार आणि सुनिल तटकरे यांची नावं घोटाळ्यात असल्याचे म्हटले होते. माध्यमांनी शपथपत्र नीट वाचावे, अशी मी विनंती करतो, असेही मुंडे म्हणाले.