..………हा माझाच विजय :नारायण राणे
सावंतवाडी:मराठा आरक्षण विधेयक विधीमंडळात मंजूर झाले. पण या विधेयकाची मूळ कल्पना ज्यांची होती त्या माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी हे आरक्षण माझेच जसेच्या तसे सरकारने दिले आहे, असे म्हटले आहे.
राणे म्हणाले की, माझ्या अध्यक्षतेखालील समितीने जो अभ्यास करुन आरक्षण मसुदा तयार केला तोच भाजप सेना सरकारने दिला आहे. मागासवर्ग आयोगानं दिलेला अहवाल आणि माझ्या समितीने दिलेला अहवाल सारखाच असल्यानं हा माझाच विजय असल्याचा दावा राणे यांनी केला. विधेयक विधीमंडळात मंजूर झाले, ही ऐतिहासिक घटना असल्याचे ते म्हणाले. याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले. मराठा समाज मागास आहे हा आयोगाचा निष्कर्ष माझ्या समितीसारखाच आहे, असेही राणे म्हणाले.
नितेश राणे यांनी चॉकलेट तेच फक्त रॅपर बदललंय अशी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात राणे समितीचा अहवाल उच्च न्यायालयाने रद्द केला नव्हता. मागील सरकारने आपली बाजू नीट मांडली नव्हती, असे ते म्हणाले. मराठा आरक्षण विधेयकाचं आम्ही स्वागत करतो. पण हजारो मराठा तरुणांना त्याच्या लाभाला मुकावं लागलं आहे. तसेच ज्या चाळीस लोकांचे बळी गेले त्यांचे काय, असा सवाल त्यांनी केला.