मुंबई उपनगरातील वीज दरवाढीची चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई उपनगरातील वीज दरवाढीची चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : मुंबई उपनगरात अदानी इलेक्ट्रिसिटीकडून करण्यात आलेल्या वीज दरवाढीच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत तसेच याबाबत नागरिकांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन याप्रकरणाची समिती मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी आ.आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. त्यावर तातडीने कार्यवाही करत या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिले आहेत.

मुंबई उपनगरात वीज वितरण करणाऱ्या अदानी कंपनीकडून अचानक वीज देयकात ५० ते १०० टक्के वाढ करण्यात आल्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झाल्या होत्या. अदानीकडून प्रत्यक्ष मीटर तपासणी न करता वीज देयक दिल्या गेल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याप्रकरणाची समिती मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी आ. शेलार यांनी पत्राद्वारे केली आहे. यात त्यांनी म्हटले आहे कि,अदानीकडून गेल्या तीन महिन्यात देण्यात आलेल्या देयकांचे ऑडिट करण्यात यावे. वीज देयके ही मीटर तपासणी करून दिली आहेत याचे पुरावे कंपनीने सादर करावे. तपासणी न करता सरासरीने पद्धतीने किती देयके वितरित करण्यात आली याची आकडेवारी देण्यात यावी. ज्यांना जास्तीच्या रकमेची देयक देण्यात आले आहे अशा ग्राहकांना याबाबत माहिती देऊन अतिरिक्त रकमेचा व्याजासहित परतावा करण्यात यावा.भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी राज्य वैधमापन विभागाला वीज मीटर तसेच देयके यांचे ऑडिट करण्याचे अधिकार तसेच निर्देश द्यावेत. राज्य सरकारने याची स्वाधिकारे दखल घेत महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाला याबाबत कायदेशीर कारवाई करण्यास सांगावे.

मुंबईकरांच्या भावना लक्षात घेऊन या प्रकरणी पारदर्शकता राहावी यासाठी राज्य ऊर्जा विभाग अधिकारी, तज्ज्ञ, ग्राहक संघटना आदींची समिती गठीत करून आकस्मिक वाढ प्रकरणाची तपासणी करावी. समितीचा अहवाल ३ महिन्यांत जनतेसमोर मांडण्यात यावा. अशा मागण्या या पत्रात केल्या आहेत.

Previous articleमराठा आरक्षण : न्यायालयात आम्हीच जिंकू : चंद्रकांत पाटील
Next articleशिर्डी संस्थानकडून सरकारला बिनव्याजी पाचशे कोटीचे कर्ज