भाजपच्या राजवटीत संविधान धोक्यात :कॉंग्रेसचा गंभीर आरोप
नागपूर:भाजपच्या चार वर्षांच्या राजवटीत संविधान धोक्यात आलं आहे. त्यांना संविधान मान्य नाही. संघाच्या विचारावर भाजपला देश चालवायचा आहे, अशी घणाघाती टीका कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी नागपुरात केली. संघाच्या बालेकिल्ल्यात त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात संघाचं योगदान काय, असा सवालही केला.
कॉंग्रेसच्या अल्पसंख्यांक सेलच्या कार्यक्रमात ते बोलत होते.भाजपला संविधान मान्य नसल्याने त्यांना जाती आणि धर्माच्या नावावर दंगे भडकवायचे आहेत, असा आरोप खरगे यांनी केला. भाजपच्या अजेंड्यावर शेतकरी नाहीच,पण आरोग्य आणि शिक्षणाला प्राधान्य दिले जात नाही, अशी टीकाही खरगे यांनी केली.
महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी भाजप नेत्यांनी इतिहास वाचून विधाने करावीत, अशी टीका केली. स्वातंत्र्यलढ्यात ख्रिश्चनांचे योगदान नाही, असे वक्तव्य भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी केले होते. त्याला अशोक चव्हाण यांनी हे उत्तर दिले. चर्च, प्रार्थनास्थळांवर हल्ले होत आहेत. यास सरकारचा पाठिंबा आहेका, असा सवाल त्यांनी केला.