चिंतामणीचे दर्शन घेवून काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेच्या चौथ्या टप्प्याची सुरूवात
यवतमाळ : गेल्या साडेचार वर्षात केंद्रातील व राज्यातील भाजप शिवसेना सरकारने जनतेला दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय मात्र सरकार काहीच उपाययोजना करत नाही. त्यामुळे जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्यांच्या हक्कांसाठी काँग्रेस पक्षाने राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा काढली आहे. या यात्रेच्या चौथ्या टप्प्याची सुरुवात आज मंगळवारी यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथून झाली असून, ही यात्रा पश्चिम विदर्भातील यवतमाळ, वाशिम, अकोला, अमरावती, बुलढाणा या जिल्ह्यांतून प्रवास करून ९ डिसेंबर रोजी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे विराट जाहीर सभेने या यात्रेचा समारोप होणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिली आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे,विधान सभेतील काँग्रेस पक्षाचे उपनेते विजय वडेट्टीवार, महिला काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षा चारूलता टोकस, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्यासह राज्यातील काँग्रेस पक्षाचे सर्व प्रमुख नेते व प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी या यात्रेत सहभागी झाले आहेत.