अमित शहांनी मुख्यमंत्र्यांना सल्ला द्यावा : शरद पवार
रायगड: तेलंगणात भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी ५० टक्क्याच्या वर आरक्षण देता येत नाही, असे सांगितले होते. पण महाराष्ट्रात तर आरक्षण जास्त दिले आहे. शहा यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सल्ला दिला पाहिजे, असा खोचक टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला लगावला.
रायगड दोऱ्यात शरद पवार एका पत्रकार परिषदेत बोलत होते. तेलंगणात प्रचार सभेत अमित शहा यांनी ५० टक्केपेक्षा जास्त आरक्षण देता येत नसल्याचे सांगितले होते.त्यांनी यावेळी भाजप शिवसेना युतीवर त्यांनी कडाडून टीका केली. भाजप सेना चार वर्ष एकत्र नांदतात. नंतर बाहेर एकमेकांविरोधात बोलतात. निवडणूक आल्यानेच अयोध्येत राजकीय वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी टीकी पवार यांनी केली. देश पातळीवर ठोस पर्याय देण्याची कोणत्याही पक्षाची ताकद नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवर आघाडी करावी, असा सल्लाही त्यांनी दिला. नंतर देश पातळीवर आघाडी केली जावी, असे ते म्हणाले.