ओबीसी-मराठा झुंज सरकारने लावली : प्रकाश आंबेडकर
औरंगाबाद: सरकारची नियत साफ असेल तर ओबीसी आणि मराठा यांच्यात झुंज लावण्याची गरजच काय? असा सवाल भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला. ओबीसीना मंडल आयोगाने दिलेले आरक्षण ग्रुप १ आणि मराठ्यांना दिलेले आरक्षण ग्रुप २ असे करून त्यात अंतर्गत बदल होणार नाही, अशी व्यवस्था केली तरच मराठा आरक्षण टिकेल,असे ते म्हणाले. ओबीसी परिषदेत ते बोलत होते.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, देशातील स्थितीत बदल करण्याची गरज आहे. हा बदल पचनी पडणार नसल्याने जाती आणि धर्माच्या भिंती उभ्या करण्याचे काम सुरू आहे. हा लढा धर्माच्या ठेकेदारांशी।आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी पन्नास वेगवेगळ्या जमातीच्या लोकांना उमेदवारी देणार असल्याचे आंबेडकरांनी सांगितले. कोणकोणत्या समाजाचे उमेदवार असतील त्याची यादी जाहीर केली जाईल. इथल्या व्यवस्थेला ओबीसींच्या हातात सत्ता नको आहे. राज्य सरकारने दिलेली शिष्यवृत्ती एका वर्षापुरतीच आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, वंचित आघाडीचा कॉंग्रेसला अजूनही प्रस्ताव आहे. परंतु राज्यातील नेत्यांची हायकमांडशी अद्याप बोलणी झालेली नाहीत, अशी माहिती त्यांनी दिली. ओबीसींच्या मुलांच्या शिक्षणासाठी देवस्थानांचा पैसा घ्या, अशी सूचनाही त्यांनी केली.