शिवसेनेचे ११ तर भाजपचे ८ आयाराम पराभूत

शिवसेनेचे ११ तर भाजपचे ८ आयाराम पराभूत

मुंबई नगरी टीम

मुंबई : विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून मोठ्या प्रमाणात शिवसेना आणि भाजपात पक्षप्रवेश झाले होते.भाजपात झालेल्या मेगा भरतीमुळे या निवडणूकीत भाजपा स्वबळावर सत्ता स्थापन करेल असे भाजपाचे नेते उघडउघड बोलत असतानाच शिवसेनेत आलेले ११ तर भाजपात प्रवेश केलेल्या ८ आयारामांना या निवडणूकीत पराभवाला समोरे जावे लागले आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील ३५ बड्या नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना आणि भाजपात प्रवेश केला होता. या नेत्यांना शिवसेना आणि भाजपाने विधानसभेची उमेदवारी दिली होती. परंतु या ३५ नेत्यांपैकी १९ उमेदवारांचा पराभव झाला आहे.या पक्षबदलू नेत्यांना महाराष्ट्राच्या जनतेने सपशेल नाकारल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेले जयदत्त क्षीरसागर आणि दिलीप सोपल यांच्यासह काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या भाऊसाहेब कांबळे यांचा श्रीरामपूरमधून पराभव झाला आहे.राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेले शेखर गोरे यांचा माण-खटाव मतदारसंघातून पराभव झाला आहे.राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या रश्मी बागल यांचा करमाळा मतदारसंघात पराभव झाला आहे.बविआमधून शिवसेनेत प्रवेश केलेले  विजय पाटील यांचा वसई मतदारसंघात पराभव झाला आहे. संजय कोकाटे यांचा माढा मतदारसंघात पराभव झाला आहे.काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या दिलीप माने यांचा सोलापूर मध्य मतदारसंघात पराभव झाला आहे.तर नागनाथ क्षीरसागर यांचा मोहोळ मतदारसंघात पराभव झाला आहे.काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या निर्मला गावित यांचा इगतपुरी मतदारसंघात पराभव झाला आहे.

राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या वैभव पिचड यांचा अकोले मतदारसंघात पराभव झाला आहे.काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या हर्षवर्धन पाटील यांचा इंदापूर मतदारसंघात पराभव झाला आहे.काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या गोपालदास अग्रवाल यांचा गोंदिया मतदारसंघात पराभव झाला आहे.वंचित बहुजन आघाडीमधून भाजपमध्ये आलेल्या गोपिचंद पडळकर यांचा बारामती मतदारसंघात पराभव झाला आहे.काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या धैर्यशील कदम यांचा कराड उत्तर मतदारसंघातून पराभव झाला आहे. रमेश आडसकर यांचा माजलगावमधून पराभव झाला आहे.भाजपच्या भरत गावित यांचा नवापूर मतदारसंघातून पराभव झाला आहे.तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या उदयनराजे भोसले यांच्या पराभव झाला आहे.

Previous articleमुंबईत युतीचा बोलबाला ! राष्ट्रवादीने खाते खोलले
Next article१५ अपक्षांचा महायुतीला पाठिंबा : मुंख्यमंत्री