आता आयटीआय कर्मचाऱ्यांना इच्छितस्थळी मिळणार बदली

मुंबई नगरी टीम
मुंबई :राज्यात कौशल्य विकास विभागांतर्गत कार्यरत असलेल्या ४१७ आयटीआय तसेच व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातील क आणि ड वर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या आता त्यांच्या इच्छेनुसार ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत.त्यासाठी कौशल्य विकास विभागाने पोर्टल सुरु केले असून या ऑनलाईन प्रणालीमुळे बदल्यांची प्रक्रिया पारदर्शक आणि सुसुत्रबद्ध पद्धतीने होऊ शकेल, अशी माहिती कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

राज्यात व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत ४१७ शासकीय आयटीआय असून त्यात ६ हजार कर्मचारी, शिक्षक कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी https://hrms.dvet.gov.in/ हे संकेतस्थळ सुरु करण्यात आले आहे. या प्रणालीच्या माध्यमातून २०२०-२१ पासून सर्व प्रकारच्या बदल्या फक्त ऑनलाईन पद्धतीनेच केल्या जाणार आहेत. राज्यात ग्रामविकास विभागानंतर ऑनलाईन बदली प्रक्रिया राबविणारा कौशल्य विकास विभाग आहे, असे मंत्री  मलिक यांनी सांगितले. सध्या बदल्यांसाठी सुमारे ७०० अर्ज आले असून या बदल्या ऑनलाईन पद्धतीने केल्या जातील.

आता पोर्टलवर ऑनलाईन बदल्यांची सुविधा देण्यात आली आहे. या पोर्टलमध्ये १० ऑप्शन देण्यात आले असून कर्मचाऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार बदली मागायची आहे. जागांच्या उपलब्धतेनुसार त्यांना त्यांच्या इच्छित स्थळी बदली मिळू शकणार आहे. तसेच कधीपर्यंत अर्ज करायचे याची तारखेची मर्यादाही देणार आहे. एकाच वेळी या बदल्या होणार आहेत. पोर्टल दरवर्षी अपडेट होत राहणार आहे. त्यामुळे मुलांचे नुकसान होणार नाही, असेही मंत्री मलिक यांनी सांगितले.

Previous articleमराठा आरक्षणासंदर्भात उद्या होणार मंत्रीमंडळ उपसमितीची पहिली बैठक
Next articleमराठा आरक्षण : सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनाची बाजू भक्कमपणे मांडणार