भाजपच्या ‘आश्वासनाचा फुगा’ जनताच फोडेल
नवाब मलिक
मुंबई दि.३१ छत्रपती का आशीर्वाद.. चलो चले मोदी के साथ’ अशी घोषणा निवडणुक काळात घदेत सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या स्मारकाची एकही वीट रचली नसल्याने हे सरकार भूलथापा देवून आपली पोळी भाजून घेण्यात यशस्वी झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु या भूलथापांचा फुगा येत्या काळात जनताच फोडेल असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केले आहे.
अरबी समुद्रामध्ये जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे जलपूजन केले आणि इंदू मिलमध्ये जावून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे भूमिपूजनही केले. महाराष्ट्रात सत्ता येण्यासाठी या दोन महापुरुषांच्या स्मारकांचा मुद्दा भाजपाने उचलला आणि सत्तेतही आले. परंतु या सरकारने सत्तेत येण्यापूर्वी या महापुरुषांच्या स्मारकांना जेवढया पध्दतीने महत्व दिले तेवढे महत्व सत्तेत आल्यावर दिलेले नाही. एकीकडे महाराजांच्या नावाने सत्तेत यायचे आणि दुसरीकडे त्यांच्या स्मारकाची वीटही रचायची नाही हा महाराष्ट्रातील जनतेचा अपमान आहे. निवडणूक काळामध्ये दिलेली आश्वासने या फक्त भूलथापाच होत्या हे आता जनतेच्या लक्षात आले आहे असेही मलिक म्हणाले.