राणेंना मंत्रिमंडळात घ्यायचे की नाही याचा विचार मुख्यमंत्र्यांनी करावा
सावंतवाडी दि.३ सध्याचे मंत्रिमंडळ स्वच्छ असून, मंत्रिमंडळात कलंकित व्यक्तीला घ्यायचे की नाही याचा विचार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करावा मात्र माझ्या संकेताप्रमाणे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या विरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयात आठवड्यात तीन वेळा सुनावणी झाली आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी अशा घटना घडणे म्हणजे ईश्वरी संकेत आहे, असे वक्तव्य गृहराज्यमंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे.
उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेले केतन तिरोडकर यांनी मागणी केल्यास त्यांना पोलीस संरक्षण दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
केसरकर म्हणाले, माजी मुख्यमंत्री राणे यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. त्यांची तीन वेळा सुनावणी झाली आहे. तर सर्वोच्च न्यायालयाने भ्रष्ट व्यक्तीची यादी सरकारकडे मागितली आहे. त्यामुळे अशा व्यक्तींना मंत्री मंडळात घ्यायचे की नाही हे मुख्यमंत्र्यांनी ठरवावे, असे सांगत मुख्यमंत्र्यांवर वरून दबाव असू शकतो, त्यामुळे त्यांना हे करावे लागत आहे. अन्यथा लोक नेता असलेल्या एकनाथ खडसे यांच्यावर आरोप झाले तर त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर ठेवण्यात आले आहे. मग राणे यांची चौकशी सुरू झाली तर त्यांनाही घ्यायचे की नाही घ्यायचे तहे भाजपाने ठरवावे.
राणेंमुळे शिवसेना कधीही सरकारमधून बाहेर पडणार नसल्याचे मंत्री केसरकर यांनी सांगितले. तसेच जिल्हाप्रमुख व संपर्कप्रमुख यांची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बैठक घेतली. पुढील दोन वर्षांत निवडणूका असून त्या पार्श्वभूमीवर ही बैठक होती, असेही त्यांनी सागून, त्यामुळे सरकारमधून बाहेर पडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे स्पष्ट केले.