मुंबई नगरी टीम
मुंबई । बहुप्रतीक्षित अशा वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील ५०० चौरस फुटांच्या घरांच्या एकूण ५५६ सदनिकांचे वितरण आज करण्यात आले.ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये दुसरा व डिसेंबरमध्ये तिसरा टप्पा पूर्ण होणार असून,वरळी येथील सर्व बीडीडी चाळ वासियांना घर मिळणार आहेत अशी माहिती देतानाच धारावीचा देखील अशाच पद्धतीने पुनर्विकास केला जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिर येथे बीबीडी चाळीतील ५५६ पुनर्वसन सदनिकांचा वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.ही केवळ चाळ नाही.तर हा इतिहास आहे.या चाळीने मागच्या शंभर वर्षांचा इतिहास पाहिलेला आहे.या चाळीच्या भिंतींमध्ये अनेक कहाण्या आहेत. अनेक प्रसंग, आठवणी या चाळीच्या भिंतीनी पाहिलेले आहेत.विविध कारणांसाठी या चाळीतील घरांमध्ये काही वेळा येणे झाले. ही फक्त नावालाच चाळ आहे.मात्र,येथील लोकांचे जगणे हे झोपडपट्टीतील रहिवाशांपेक्षा वाईट असल्याचे येथील भेटीदरम्यान पाहिले आहे.राज्यात महायुतीचे सरकार येताच बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचा प्रकल्प हाती घेतला. बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा दीर्घकाळाचा अडथळा शासनाने दूर करत सामान्य मुंबईकरांना त्यांच्या हक्काचे घर देण्याच्या दिशेने पाऊले टाकली असल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आजवर २० ते २५ वर्षांपासून विविध कारणांनी हा प्रकल्प रखडला होता. शासनाने या प्रकल्पात विकासक न नेमता, थेट म्हाडा मार्फत हा प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला. जागतिक निविदा काढून काम हाती घेण्यात आले. जागेचा सर्वोत्तम वापर, सौर ऊर्जा, पावसाच्या पाण्याचा निचरा,कचरा व्यवस्थापन अशा आधुनिक सुविधा यामध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत.ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये दुसरा व डिसेंबरमध्ये तिसरा टप्पा पूर्ण होणार असून, वरळी येथील सर्व बीडीडी चाळ वासियांना घर मिळणार आहेत,असेही,मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
धारावी पुनर्विकासालाही गती मिळाली असून १० लाखांहून अधिक लोकसंख्येचा हा परिसर एक ‘नवीन शहर’ म्हणून उभारला जाणार आहे. येथील सर्व रहिवाशांना पात्र ठरवत घर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. धारावीत पाच वर्षांपर्यंत तेथील व्यवसायांवर कर सवलती देण्यात येतील. धारावी ही औद्योगिक वसाहत होऊन तिथेच रोजगार निर्मितीसुद्धा करण्यात येणार आहे.बीडीडी चाळ वासियांना मिळालेली घरे ही केवळ बांधकाम नसून,पुढच्या पिढ्यांसाठी सोन्यासारखी गुंतवणूक आहे. हा ठेवा पुढील पिढीला द्यायचा आहे.त्यामुळे कोणीही यातील घर विकू नये, असे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.