अनिकेत कोथळे हत्येचा खटला जलदगती न्यायालयात चालवा!
विखे पाटील यांची मागणी
सांगली दि. १३ सांगलीतील अनिकेत कोथळेच्या कोठडीतील हत्या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून दोषींना फासावर चढविण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
विखे पाटील यांनी आज सांगली येथे कोथळे कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर कडाडून टीका केली. ते म्हणाले की, केवळ संशयाच्या आधारे सर्वसाधारण कुटुंबातील युवक असलेल्या अनिकेत कोथळेला तातडीने अटक करून मरेपर्यंत मारहाण करण्यात आली. अलिकडच्या काळात पोलीस खात्याची अधोगती झाली आहे. राज्यकर्त्यांकडून गुन्हेगारांना उघड राजाश्रय मिळत असल्याने गुन्हेगार बेलगाम झाले असून, परिणामतः गुन्हेगारी वाढली आहे. गुन्हेगारीकडे डोळेझाक करता-करता आता पोलीस स्वतःच ‘सुपारी किलिंग’करू लागल्याचा आरोप त्यांनी अनिकेत कोथळेच्या मृत्युचा संदर्भ देताना केला. बेकायदेशीर व्यवसाय दडपण्यासाठी पोलिसांनी अनिकेतला खोट्या गुन्ह्यात अडकवून ताब्यात घेतल्याचा कोथळे कुटुंबियांचा आरोप अत्यंत गंभीर आहे. अनिकेत कोथळेला न्याय द्यायचा असेल तर आरोपींना शिक्षा होण्यासोबतच त्याच्या उद्धवस्त झालेल्या कुटुंबाला आधार देण्याची मागणीही त्यांनी केली.