ऊस दर नियंत्रण संदर्भात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी
सुभाष देशमुख यांचे आवाहन
मुंबई, दि.१५ राज्यात ऊसाला योग्य भाव मिळावा यासाठी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून पैठण आणि अहमदनगर येथे होत असलेल्या आंदोलनामुळे शेतकऱ्यांचे आणि राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांनी शांततेच्या मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी पत्रकार परिषदेत आज केले.
पैठण आणि अहमदनगर येथे शेतकरी संघटनांचे ऊस दर संदर्भात आंदोलन सुरू आहे पार्श्वभूमीवर श्री.देशमुख यांनी मंत्रालयात पत्रकार परिषद घेतली.देशमुख म्हणाले, शासनाने ऊसाला २५० रुपये एफआरपी वाढवून दिली आहे. कोल्हापूर येथे शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत, केंद्र शासनाच्या आदेशानुसार सरसकट भाव जाहीर करता येणार नाही. राज्य शासन हमीभावावर ठाम असून कारखान्यांनी ऊसाच्या पहिल्या उचलवर १०० रुपये वाढवून द्यावे आणि नंतर साखरेचा दर पाहून १०० रुपये द्यावे असे निश्चित करण्यात आले होते. कोल्हापूरच्या धर्तीवर राज्यातील सर्व कारखान्यांनी ऊसाला भाव द्यावा असे ठरविण्यात आले असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
देशमुख म्हणाले की, कारखान्यातील वजन काटे तपासणीसाठी राज्यात भरारी पथके तयार करण्यात आली असून त्यानुसार तपास सुरु आहे. कोणालाही संशय असल्यास त्यांनी तक्रार करावी. त्या ठिकाणी जाऊन हे भरारी पथक तपासणी करेल.राज्यातील सर्व साखर विक्री करणाऱ्या कारखान्यांनी टेंडर प्रक्रिया ऑनलाईन राबवून आयुक्त कार्यालयात कळवावे, असे निर्देश देण्यात आले असल्याचे देशमुख यांनी सांगितले. तसेच एफआरपी पेक्षा कमी भाव देणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.