छगन भुजबळ लढवय्ये नेते,ते तुरूंगाच्या बाहेर आले पाहिजेत
राज्यमंत्री कांबळे यांचे धक्कादायक वक्तव्य
पुणे दि.२८ माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे लढवय्ये नेते असून, ते तुरूंगाच्या बाहेर आले पाहिजेत”, असे धक्कादायक वक्तव्य खुद्द राज्याचे समाजिक न्यायमंत्री राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
आज महात्मा फुलेंच्या पुण्यतिथीनिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेकडून पुण्यामध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी भुजबळांवर स्तुतीसुमने उधळली आहेत.
“ज्या कलमाच्या आधारे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना जामीन मिळत नव्हता ते कलमच रद्द झाल्याने आता भुजबळ लवकरच बाहेर येतील. भुजबळ हे लढवय्ये नेते आहेत. ते कायद्याच्या कचाट्यात अडकले, मात्र लवकरच ते जेलबाहेर येतील” असे वक्तव्य राज्यमंत्री कांबळे यांनी केले आहे. त्याच प्रमाणे भुजबळ यांना लवकर जामीन मिळावा ही ईश्वर चरणी प्रार्थना. कायदेशीर लढाई लढून ते लवकरच बाहेर येतील, असा विश्वास कांबळे यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला.समता परिषदेकडून दिला जाणारा ‘समता पुरस्कार’ ज्येष्ठ विचारवंत मा.गो.माळी यांना देण्यात आला. राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.