छगन भुजबळ यांच्या समता परिषदेचे योगदान महत्वाचे
शरद पवार यांचे वक्तव्य
पुणे,दि.२८ अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ यांनी देशातील पिडीत व वंचित घटकांपर्यत महात्मा जोतीराव फुले यांचे विचार पोहचवून त्यांना आपला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी स्थापन केलेल्या अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे योगदान महत्वाचे असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी केले आहे.
महात्मा जोतिराव फुले यांच्या १२७ व्या पुण्यतिथी निमित्ताने फुले वाडा पुणे येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता पुरस्काराच्या वितरण सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते.
पवार पुढे म्हणाले की, छगन भुजबळ यांनी स्थापन केलेली महात्मा फुले समता परिषद आज संपूर्ण देशातील कानाकोपऱ्यात पोहचली असून देशातील पिडीत व वंचित घटकातील न्याय हक्कासाठी मोलाचे काम करत आहे. तसेच उत्तर भारतात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्य वाढविण्यासाठी उपेंद्र कुशवाह यांचे काम मोठे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अखिल भारतीय समता परिषद व भुजबळ यांच्या सतत पाठपुरावा व लढयामुळे आज संसदेच्या प्रांगणात महात्मा फुले यांचा पुतळा उभारला गेला आहे. त्यामुळे देशातील खासदारांनी संसदेत प्रवेश करत असतांना त्यांना अभिवादन करून त्यांचे समतेचे विचार जोपासण्यासाठी काम त्यांच्या हातून घडावे हा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
तपवार पुढे म्हणाले की, आधुनिक विज्ञानाचे पुरस्कर्ते देशाला विकासाची दृष्टी देणारे महात्मा जोतिराव फुले यांचे विचार राज्याच्या आणि देशाच्या विकासासाठी मोलाचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. महात्मा फुले यांनी शेतकरी हितासाठी, स्त्री शिक्षणासाठी, तसेच समाजातील प्रत्येक घटकाला शिक्षणाचा हक्क मिळावा यासाठी त्यांनी काम केले. आधुनिक भारताचे विज्ञानाचे पुरस्कर्ते होते. देशात अन्नधान्याचे उत्पादन वाढावे यासाठी ब्रिटीश सरकारकडे शेतमालाचे व दुधाचे संकरीत वान निर्माण करण्याची मागणी केली. त्यातून शेतकऱ्याचे शेतमालाचे व दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले. ते खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे कैवारी होते असे त्यांनी सांगितले. तसेच शिक्षण क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणारे तसेच ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षण मिळावे यासाठी साखर शाळेला प्रोत्साहन देणारे डॉ.मा.गो.माळी यांचे योगदान महत्वपूर्ण असून त्यांचा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने सन्मान केला ही गौरवाची बाब असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
केंद्रीय मानव संसाधन राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह म्हणाले की, समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ आज संकट काळातुन जात असून आपण सर्व त्यांच्या सोबत आहे. आज ते कार्यक्रमाला उपस्थित राहु शकले नाही याची खंत वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. देशाच्या न्याय व्यवस्थेत खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय मिळण्यासाठी ओबीसी,एससी, एसटी समाजातील नागरिकांना न्याय व्यवस्थेत प्रतिनिधित्व मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. जोपर्यंत देशात त्यांना स्थान मिळत नाही तोपर्यंत देशात खऱ्या अर्थाने समाजिक न्याय मिळू शकत नाही असे सांगून देशात आजही पक्षपात सुरु असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. ओबीसींना खाजगी क्षेत्रात नोकरीची संधी मिळावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. तसेच लवकरच इतर मागासवर्ग आयोगाला घटनात्मक दर्जा मिळणार असून ओबीसींना त्यांच्या न्याय हक्क मिळविण्यासाठी कोणीही बाधा आणू शकत नाही असे त्यांनी शेवटी सांगितले.