उत्तर भारतीय आणि इतर राज्यातून येणारे लोक मुंबईला महान बनवतात
मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे वाद उपस्थित होण्याची शक्यता
मुंबई दि. ३० उत्तर भारतीय हे मुंबईची शान असल्याचे वक्तव्य भाजपच्या खासदार पुनम महाजन यांनी केल्यानंतर उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या असतानाच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही’ उत्तर भारतीय आणि इतर राज्यातून येणारे लोक मुंबईला महान बनवतात, त्यांनी मुंबईचा गौरव वाढवला, असे विधान केल्याने वाद उपस्थित होण्याची शक्यता आहे.
घाटकोपरमध्ये शिक्षण महर्षी आय. डी. सिंह यांच्या नावाने उभारलेल्या चौकाचे उद्घाटन काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांनी “उत्तर भारतीय आणि इतर राज्यातून येणारे लोक मुंबईला महान बनवतात, त्यांनी मुंबईचा गौरव वाढवला,” असे वक्तव्य केले आहे. भाषा माणसाला जोडते त्यामुळे भाषा हे विवादाचे माध्यम होऊच शकत नाही. असा वाद निर्माण करणे चुकीचे आहे. मतांच्या राजकारणासाठी कोणी भाषिक वाद करु नये. मराठी संस्कृतीचा आम्हाला अभिमान आहेच. पण याच मराठी आणि मुंबईतील संस्कृतीबरोबर उत्तर भारतीय संस्कृतीही एकजीव झाली आहे.” असे मुख्यमंत्री आपल्या भाषणात म्हणाले
मुंबईत काही लोक उत्तर भारतीय लोकांना लक्ष्य करीत आहेत. परंतु आम्ही सक्षम असून, तक्रार करण्याआधीच अशा लोकांवर कारवाई करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मुंबई आणि उपनगरामध्ये फेरीवाला आणि मराठी फलकावरून मनसे आक्रमक झाली आहे.त्यांनी ठिकठिकाणी आंदोलने केली आहेत. मनसेच्या काही पदाधिका-यांना जबर मारहाणही करण्यात आली असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या वक्तव्यावरून वाद उपस्थित होण्याची शक्यता आहे.