राष्ट्रवादीचे हल्लाबोल आंदोलन ‘माणुसकीचे आंदोलन’ असेल
खा. सुप्रिया सुळे
यवतमाळ दि. ३० गरीबांची चेष्टा करणाऱ्या आणि सर्वच क्षेत्रात अपयशी ठरलेल्या खोटारड्या सरकारच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने १ डिसेंबरपासून हल्लाबोल पदयात्रा काढण्यात येत असून हे माणुसकीचे आंदोलन असेल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यवतमाळ येथे दिली.
सुळे यांनी यावेळी नाकर्त्या सरकारवर हल्लाबोल केला. त्यांनी हे सरकार गरीब शेतकऱ्यांवर आणि महिलांवर अन्याय – अत्याचार करीत आहे,राज्यातील शेतकऱ्यांची तर हे सरकार चेष्टाच करत आहेत. राज्यात अंगणवाडी सेविका, डॉक्टर, वकील यांचे प्रश्नही वाढत आहेत. खोटया जाहिराती देवून हे सरकार फसवणूक करत आहे. कर्जमाफी झाली नसताना कर्जमाफी झाल्याचे सरकार बोलत आहे असे सांगतानाच खरच कर्जमाफी झाली आहे का असा सवाल त्यांनी केला.राज्यातील शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्याचे काम हे सरकार करत आहे. ही सरकारची माणूसकी आहे का ? गरीब माणसाला उध्वस्त करण्याचे काम हे सरकार करत असल्याचा आरोप सुळे यांनी यावेळी केला.
मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावेत आणि निर्णय फोल ठरल्यास त्याला कारणीभूत ठरल्यास त्या अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवावे. कर्जमाफीचा निर्णय हा अधिकाऱ्यांनी घेतला नसल्याने हा ऑनलाईनमधील फार मोठा घोटाळा आहे असा आरोप खा.सुळे यांनी करतानाच मुख्यमंत्री जर पारदर्शक काम करत असतील तर त्यांनी पारदर्शक चौकशी करावी अशी मागणी खा. सुळे यांनी केली.शिक्षण क्षेत्राबद्दल बोलताना सुळे यांनी शिक्षण खात्याचे नाव बदलण्याची आवश्यकता असल्याचे सांगतानाच या खात्याचे नाव जीआर खाते असे ठेवण्याची मागणी केली. कारण दरदिवशी शिक्षण खात्यातील निर्णय बदलत असतात असा टोला सुळे यांनी लगावला.