कायदा व सुव्यवस्था राखण्यात मुख्यमंत्री अपयशी

कायदा व सुव्यवस्था राखण्यात मुख्यमंत्री अपयशी

धनंजय मुंडे यांचा आरोप

परभणी : भिमा-कोरेगावला घडलेली दंगल हे राज्य सरकार व गृहखाते सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे अपयश असून, या घटनेस राज्य सरकारच जबाबदार असल्याचा आरोप विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.  कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यात दुर्लक्ष का झाले? राज्य सरकार म्हणुन तुम्ही काय करत होतात? असा सवालही मुंडे यांनी उपस्थित केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मराठवाडय़ात होणाऱ्या हल्लाबोल यात्रेच्या तयारीसाठी महाराष्ट्र विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे रविवारी परभणी, हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आले होते. राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीपूर्वी मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतली.‘भाजपचे जबाबदार समजले जाणारे शाम जाजु यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजाच्या बाबतीत बोलणं हा छत्रपती शिवरायांचा अपमान आहे. भाजपला जातीय तेढ निर्माण करायची असून मागील साडे तीन वर्षात हेच दिसून आले आहे. भिमा-कोरेगाव प्रकरणी झालेली दंगल हे सरकारचे अपयश असून जातीय तेढ निर्माण करणारे कोण आहेत? हे सरकारला माहीत नाही का असा प्रश्न मुंडे यांनी उपस्थित केला. गृहखाते सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्याचे हे अपयश आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम सरकारचे असून या दंगलीला जबाबदार असलेले कुठल्याही जातीचे, पक्षाचे, संघटनेचे असोत त्यांच्यावर कारवाई करावी, अशी राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी असे मुंडे म्हणाले. तसेच याप्रकरणात माध्यमांना बोलण्यापेक्षा रामदास आठवले यांनी मुख्यमंत्र्यांना बोलावे असा टोलाही मुंडे यांनी लगावला. राज्य सरकारने भिमा कोरेगाव दंगल प्रकरणी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणीही मुंडे यांनी केली.

Previous articleशेतकरी, सर्वसामान्य नागरिक, युवक आणि मराठवाड्याच्या प्रश्नासाठी हल्लाबोल यात्रा 
Next articleतेलंगणा राज्याप्रमाणे राज्यातील शेतक-यांना मोफत वीज द्यावी 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here