रिपब्लिकन पक्षाची मुंबईत सामाजिक सलोखा रॅली
मुंबई : भीमा -कोरेगाव येथे आंबेडकरी जनतेवर झालेल्या हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षाने राज्यभर सामाजिक सलोखा रॅलीचे आयोजन केले आहे . मुंबईत आठवले यांच्या उपस्थितीत हि रॅली निघणार आहे .
सामाजिक सलोख्याचे संदेश देणाऱ्या या रॅली मूक रॅली असणार आहेत. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक समतेचा बंधुत्वाचा एकतेचा संदेश देणाऱ्या या मूक रॅली असतील. मुंबईत रिपाइंच्या सामाजिक सलोखा रॅलीचा प्रारंभ येत्या २२ जानेवारीला दुपारी २ वाजता मुंबईत चैत्यभूमी येथे केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात होणार आहे. सामाजिक सलोखा रॅलीला चैत्यभूमी येथे सुरुवात होणार असून टिळक ब्रिजमार्गे दादर पूर्व नायगावच्या स्वातंत्र्यसैनिक सदाकांत ढवण मैदान येथे या रॅलीचे सभेत रूपांतर होणार आहे .