डहाणू-सांगलीतील मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री निधीतून मदत
मुंबई : डहाणूजवळच्या समुद्र किनाऱ्यावर बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत तीन विद्यार्थिनी तसेच सांगली येथील सद्भावना रॅलीनंतर परतताना एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चारही मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत जाहीर केली आहे.
डहाणूजवळच्या समुद्र किनाऱ्यावरील दुर्घटनेत मसोली ता. डहाणू येथील सोनल भगवन सुरती, जान्हवी हरीश सुरती आणि संस्कृती सूर्या माह्यावंशी या तीन विद्यार्थिनी मृत्यूमुखी पडल्या होत्या. त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून जाहीर करण्यात आली आहे. तसेच सांगली येथे गेल्या रविवारी जिल्हा प्रशासनातर्फे काढण्यात आलेल्या सद्भावना रॅलीत उपस्थित राहून परतणाऱ्या ऐश्वर्या शशिकांत कांबळे या विद्यार्थिनीचा प्रकृती बिघडल्याने मृत्यू झाला होता. तिच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे.