राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला दोन हजार किमीचा प्रवास !

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला दोन हजार किमीचा प्रवास !

सात जिल्हे आणि २६ तालुके पिंजुन काढले

सेल्फी विथ अजितदादा आणि धनंजय मुंडेंसाठी तरूणाईची झुंबड

मुंबई : राज्यातील फडणवीस सरकारच्या कारभारा विरूध्द राष्ट्रवादी काँग्रेसने मागील नऊ दिवसात मराठवाड्यात काढलेल्या हल्लाबोल यात्रेस मोठा प्रतिसाद मिळाला. पक्षाच्या बड्या नेत्यांनी नऊ दिवसात दोन हजार किलोमिटरचा प्रवास करतांना मराठवाड्यातील सात जिल्हे आणि २६ तालुके  पिंजुन काढले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुलुखमैदानी तोफ धनंजय मुंडे यांच्या सोबत सेल्फी काढण्यासाठी तरूणाईची सर्वत्र उडालेली झुंबड पाहता युवक वर्ग मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी काँग्रेसकडे आकर्षीत होत असल्याचे चित्र या यात्रे दरम्यान पाहण्यास मिळाले.

१ डिसेंबर ते ११ डिसेंबर या काळात विदर्भात पदयात्रा काढुन हल्लाबोल केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने दुसर्‍या टप्प्यात मराठवाड्यावर लक्ष केंद्रीत करत नऊ दिवसांची झंझावती हल्लाबोल यात्रा काढली. तुळजापुर येथुन देविचे दर्शन घेवुन सुरू झालेल्या या यात्रेचा काल जालना जिल्ह्यातील बदनापुर येथे समारोप झाला. तर ३ फेब्रुवारी रोजी औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयावर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली निघणारा मोर्चा आणि जाहीर सभेने या मराठवाड्यातील यात्रेची सांगता होणार आहे.

नऊ दिवसात दोन हजार किलोमिटरचा प्रवास करतांना सात जिल्ह्यातील 26 तालुक्यात ही यात्रा पोहोचली. दररोज तीन या प्रमाणे 26 सभांना नेत्यांनी मार्गदर्शन केले. अनेक ठिकाणी छोट्या पदयात्रा, मोटार सायकल रॅली, जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी आणि तहसिल कार्यालयांवर मोर्चे काढुन शासनाला निवेदने देण्यात आली. बांधावर जाऊन शेतकर्‍यांची संवाद, रूग्णालयात जाऊन उपचार घेत असलेल्या शेतकर्‍यांच्या भेटी, सर्व सामान्य नागरीकांच्या बैठका या माध्यमातुनही त्यांनी जनतेशी थेट संवाद साधला. सभांना मिळालेला प्रतिसाद सत्ताधारी पक्षांना धडकी भरवणारा ठरला आहे. तुळजापुर पासुन ते शेवटच्या सभेपर्यंत प्रत्येक सभेला हजारोंची गर्दी त्यात महिलांची विशेष उल्लेखनीय उपस्थिती आणि तरूणाईचा उत्साह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा आत्मविश्वास वाढवणारा होता.

पक्षाचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे या तिघांनी सगळ्याच सभा गाजवल्या. सुनिल तटकरे यांची चौफेर टीका, अजित दादा यांनी विरोधकांवर साधलेला निशाणा आणि धनंजय मुंडे यांचा हल्लाबोल हे यात्रेचे वैशिष्टे ठरले खा.सौ.सुप्रिया सुळे यांनी ही काही सभांना उपस्थिती दर्शविली. ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, महिला प्रदेशाध्यक्षा सौ.चित्राताई वाघ, प्रवक्ते नवाब मलिक, आ.शशिकांत शिंदे, माजी मंत्री आ.राजेश टोपे, आ.राणा जगजितसिंह, आ.विक्रम काळे, आ.सतिष चव्हाण, युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते, विद्यार्थी अध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष ईश्वर बाळबुधे, सरचिटणीस बसवराज पाटील, डॉ.नरेंद्र काळे यांनी या सभेत सहभाग घेतला. मराठवाड्यातील पक्षाचे आजी, माजी मंत्री, खासदार, आमदार आणि पदाधिकार्‍यांनीही या सभेत सक्रिय सहभाग घेतला.

शेतकर्‍यांना अद्याप न मिळालेली कर्जमाफी बोंडअळीमुळे झालेले नुकसान, शेतमालाला मिळत नसलेला भाव, विजेचे प्रश्न, वाढती महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार, कायदा व सुव्यवस्था आणि मराठवाड्याच्या प्रश्नांना या नेत्यांनी आपल्या भाषणातुन हात घातला. जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न आणि सरकारकडुन जनतेचा झालेला अपेक्षाभंग यामुळे नाराज असलेल्या जनतेचा रोष ही यात्रेला मिळालेल्या प्रतिसादावरून लक्षात आला. नेत्यांनी मुख्यमंत्र्यांपासुन बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे , पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्यासह सर्वच मंत्री आणि सत्ताधारी शिवसेनेलाही लक्ष केले.

कडकशिस्त आणि अजिबात गैर खपवुन न घेणारे अशी वेगळी ओळख असलेले अजित पवार यांचे तरूणा विषयीचे मायेचे आणि आणखी एक वेगळ रूप हल्लाबोलच्या आंदोलनामध्ये सर्वांना अनुभवायला मिळाले. या त्यांच्या वेगळ्या अनुभवाने संपुर्ण आंदोलनामध्ये तरूणाईचा मोठा लोंढा त्यांच्या व धनंजय मुंडे भोवती पहायला मिळाला. या दोघांची तरूणांमध्ये असलेली क्रेज त्यांच्या सोबत सेल्फी काढतांना उडणार्‍या झुंबडीमधुन पहावयास मीळाली. सेल्फीसाठी धडपडणारे तरूण, दादा आणि धनंजय मुंडे यांची एक झलक मिळवण्यासाठी तरूणाईचे किलकिलनारे मोबाईल कॅमेरे यामुळे युवकांचा उत्साहही या नेत्यांना मोडता येत नव्हता. दादा आणि धनंजय मुंडे यांच्यासाठी उधळलेला हा तरूणाईचा वारू राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागे एक नविन ताकद निर्माण करण्यात यशस्वी झाल्याचे राजकिय जाणकार बोलत आहेत. विशेषत: धनंजय मुंडे यांचे व्यक्तीमत्व, त्यांचे आक्रमक शैलीतील भाषण यामुळेही युवक वर्ग मोठ्या प्रमाणावर पक्षाकडे आकृष्ट होत असल्याचे चित्र पाहण्यास मिळाले.

Previous articleविद्युत प्रकाशाने एलिफंटा बेट आता लखलखणार
Next articleकुठे नेऊन ठेवलाय शेतकरी माझा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here