बाळासाहेबांच्या अटकेवेळी’ कुठे गेली होती ‘आपुलकी’
उद्धव ठाकरे यांचा सवाल
मुंबई : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या वयाच्या ७० व्या वर्षी अटक करण्याचा प्रयत्न झाला होता त्यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची बाळासाहेबांबद्दल असणारी आपुलकी कुठे गेली होती असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज उपस्थित करीत पवार यांना टोला लगावला.
शिवसेनेच्या आमदार आणि प्रवक्त्या निलम गोऱ्हे यांच्या ‘शिवसेनेतील माझी २० वर्षे’ या पुस्तकाचे प्रकाशन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
आर्थिक निकषानुसार आरक्षण मिळावे ही बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका स्विकारली असती, तर जातीपातीच्या भिंती कधीच उभ्याच राहिल्या नसत्या असेही ठाकरे म्हणाले. बाळासाहेबांची ही भूमिका स्विकारली गेली नसल्याने जातीपातीच्या आधारावर राजकारण करण्यात आले. शिवसेना फोडण्याचाही प्रयत्न करण्यात झाला असे ठाकरे म्हणाले.२००० साली एका अग्रलेखाचे प्रकरण उकरुन काढण्यात आले. बाळासाहेबांचे वय ७० वर्षे असतानाही त्यांना अटक करण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी बाळासाहेबांबद्दलची आपुलकी कुठे गेली होती, असा प्रश्न उपस्थित करीत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांना टोला लगावला.