भाजपच्या चौथ्या उमेदवारामुळे राज्यसभा निवडणूकीत रंगत !
मुंबई : येत्या २३ मार्चला राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणारी निवडणूक बिनविरोध होईल ही राजकीय क्षेत्रातील अपेक्षा भारतीय जनता पक्षाने उधळून लावली असून, भाजपने या निवडणूकीत सातवा उमदेवार उतरवला आहे. आज अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी भाजपाचे व्ही मुरलीधरन, नारायण राणे आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर अशा तीन उमेदवारांचे अर्ज दाखल केले आहेत.
आज सोमवार १२ मार्च ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती.१३ मार्च रोजी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे तर; १५ मार्च ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. सहा पेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने आता भाजपच्या पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तारखेला भाजपच्या एका उमेदवाराने माघार घेतल्यास ही निवडणूक बिनविरोध होईल अन्यथा २३ मार्च रोजी मतदान घेण्यात येईल.