शिवसेना ही गांडुळाची अवलाद
अजित पवार यांची टिका
कोल्हापूर : भाजपसोबत सत्तेत बसायचं, मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्व प्रश्नांना मान्यता द्यायची आणि एखादा प्रश्न निर्माण झाला की विरोध करायचा असे सांगत अरे शिवसेना ही गांडुळाची अवलाद आहे. त्याचं तोंड इकडे की तिकडे कळत नाही तशी अवस्था शिवसेनेची झाली असल्याची घणाघाती टिका माजी उपमुख्यमंत्री आणि विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी नेसरी येथे हल्लाबोल यात्रेच्या जाहीर सभेत केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात नेसरी येथील जाहीर सभेने झाली. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सभेलाही अलोट गर्दी लोट होती. या सभेत अजित पवार यांनी भाजपसोबत सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेवर जोरदार टिका केली. पवार यांनी आपल्या भाषणामध्ये साडे तीन वर्ष खोटी आश्वासने देणाऱ्या भाजपला साथ देणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला.साडे तीन वर्ष भाजप आणि शिवसेना यांचा भोंगळ कारभार सुरु आहे. भाजप आणि शिवसेना ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. शिवसेनेला शेतीतलं काय कळतं.या शिवसेनेचे नेते मुंबईत राहतात.त्यांच्या नेत्यांची एक गुंठेही शेती नाही त्यांना शेती काय कळणार अशी खरमरीत टिका पवार यांनी केली.
हे सरकार शेतकरी विरोधी आहे.शेतकऱ्यांचे प्रश्न जाणणारे असते तर हे सरकार शेतकऱ्यांसोबत असे वागले नसते.या सरकारची इच्छाशक्ती असेल तर मार्ग निघू शकतो परंतु या सरकारची काही करण्याची इच्छाशक्तीच नसल्याचा आरोप त्यांनी केला.लोकसभा-विधानसभा काही महिन्यावर येवून ठेपल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातून जास्तीत जास्त खासदार आणि आमदार निवडून द्या.नाही तुमचे प्रश्न सोडवले तर पवारांची अवलाद सांगणार नाही अशी इच्छाशक्ती पवार यांनी व्यक्त केली.