नोटाबंदी, मांसबंदीनंतर मोदीबाबा नसबंदीही करतील : धनंजय मुंडे
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा सांगलीत सत्कार सोहळा
सांगली: नरेंद्र मोदी ज्या ‘अच्छे दिन’च्या घोषणेच्या जीवावर निवडणुका जिंकले, त्या ‘अच्छे दिन’च्या घोषणेची आज गावागावात चेष्टा सुरु आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी लगावला. ते सांगलीत बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सांगलीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. धनंजय मुंडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.“देशात नोटाबंदी, मांसबंदी करणारे हे मोदीबाबा आता आपली नसबंदी केल्याशिवाय राहणार नाहीत” असा टोलाही धनंजय मुंडेंनी पंतप्रधानांना लगावला.काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात ‘बहुत हो गयी महगाई’ म्हणणाऱ्या भाजपच्या सत्तेत आज महागाई चार पटीने वाढली आहे. बेरोजगारी वाढली आहे. ज्या तरुणांनी मोठा रोजगार मिळेल या आशेने मोदींना डोक्यावर घेतले, ‘हर हर मोदी, घर घर मोदी’ अशा घोषणा दिल्या, तीच तरुणाई २०१९ मध्ये भाजपला पायाखाली तुडवल्याशिवाय राहणार नाही, असा घणाघात धनंजय मुंडे यांनी केला.
मोदींनी प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये देण्याचे गाजर दाखवले होते. पण जनतेला अजूनही १५ लाख मिळण्याची आशा लागून राहिली आहे. पण बँकेत १५ लाख येतील हे विसरा, मोदींच्या कृपेने १५ लाखाचे कर्ज तुमच्यावर दिसले, तर आश्चर्य वाटून घेऊ नका, असं धनंजय मुंडे म्हणाले.सांगली जिल्ह्याकडे प्रदेशाध्यक्षपद आले की परिवर्तन होते, असा आजपर्यंतचा इतिहास आहे. आता जयंत पाटील यांच्या रुपाने पुन्हा एकदा सांगलीला प्रदेशाध्यक्षपद मिळल्याने सत्ता परिवर्तन निश्चित होईल असा विश्वासही मुंडेनी व्यक्त केला.
यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी २०१९ मध्ये महाराष्ट्रत भाजपचे सरकार राहणार नाही, आम्ही पुन्हा सत्तेवर येऊ असा आम्हाला विश्वास असल्याचे म्हटलं.आता लाट निर्माण करण्याची ताकद मोदींमध्ये नाही, आली तर राष्ट्रवादीचीच लाट येईल, असेही जयंत पाटील म्हणाले.
सांगली हा ऊस उत्पादक आणि साखर कारखान्याचा जिल्हा आहे तर मी ऊसतोड मजुराचा मुलगा आहे. एका कारखानदाराचा ऊसतोड मजुराच्या हस्ते सत्कार होत आहे . हा त्यांचा सत्कार असला तरी आपला गौरव असल्याचे मुंडे म्हणाले.ज्या ज्या वेळी सांगलीने पक्षाचे नेतृत्व केले त्या त्या वेळी पक्षाला सत्ता मिळाली आहे आताही जिल्ह्याला संधी मिळाली असल्याने २०१९ मध्ये यश मिळेल असा विश्वास व्यक्त करतांना माझ्या आणि जयंत पाटील साहेबांच्या नावात जय आहे तो आता पक्षाला मिळवून देऊ असा विश्वास दिला.
जयंत पाटील साहेब यांना आता राज्याची जबाबदारी आहे त्यामुळे जिल्ह्याने त्यांना अधिक वेळ द्यावा राज्यात परिवर्तन करावायचे आहे त्याची सुरुवात सांगली महापालिका निवडणूकीने करावी असे आवाहन करताना भाजपने सांगलीला काय दिले असा सवाल करत महापालिका निवडणुकीचा नारळ ही फोडला.