संविधानाचा अवमान करणाऱ्या संभाजी भिडेला अटक करा : आठवले
रामदास आठवले
पालघर : भारतीय संविधान लोकशाही राज्यव्यवस्थेत सर्वश्रेष्ठ आहे. संविधानापेक्षा कोणी मोठा नाही मात्र नंदुरबार येथे धर्मनिरपेक्षता मान्य नसल्याचे सांगत संविधानाचा अवमान करणारे वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडेला अटक केली पाहिजे अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पालघर येथे झालेल्या जाहीर सभेत केली.
पालघर जिल्हा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आयोजित महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर , तथागत गौतम बुद्ध आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संयुक्त जयंती महोत्सवात रामदास आठवले प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी नवनिर्वाचित खासदार राजेंद्र गावित यांचा आणि केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांचा रिपाइंच्या वतीने सत्कार करण्यात आला.डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान विश्वातील सर्वश्रेष्ठ संविधान आहे.संविधानामुळे भारतीय लोकशाही मजबूत आहे.प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी अनेकदा सांगितले आहे की संविधान हा माझा सर्वश्रेष्ठ धर्मग्रंथ आहे.देशासाठी आणि सर्व धर्मांसाठी संविधान श्रेष्ठ आहे. ज्याला संविधान मान्य नाही त्याला देशात राहण्याचा अधिकार नाही. त्यामुळे संविधानाचा अवमान करणाऱ्या संभाजी भिडेवर गुन्हा दाखल करून अटक केली पाहिजे अशी मागणी रामदास आठवले यांनी यावेळी केली.
जात धर्म वंश पेक्षा देश मोठा ही शिकवण महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिली आहे. आंबेडकरी विचारांशी आम्ही एकनिष्ट असल्याचे आठवले यावेळी म्हणाले. पालघर मध्ये अत्याधुनिक सुविधांसह सुसज्ज रुग्णालय उभारण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन ना रामदास आठवलेंनी यावेळी दिले. तसेच अजमेर शरीफ दर्ग्याला हिंदू मुस्लिम सर्व धर्मीय भाविक जात असतात.त्यामुळे अजमेर ला जाणाऱ्या ट्रेन ला पालघर रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात येईल त्यासाठी आपण रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊ असे आश्वासन आठवलेंनी यावेळी दिले.
केंद्रियराज्यमंत्री आठवले यांच्या प्रयत्नामुळे सहकार्यामुळे आपण खासदार म्हणून निवडून आल्याची कृतज्ञ भावना नवनिर्वाचित भाजप चे पालघर चे खासदार राजेंद्र गावित यांनी व्यक्त केली. ना रामदास आठवले यांनी आणि पालघरवासीयांनी दाखविलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही तसेच खासदार म्हणून मिळणारे ९ महिन्यांचा अल्प काळात चांगली कामगिरी करून पालघरला सुसज्ज रुग्णालय आणि रेल्वे संबंधीचे प्रश्न सोडवू असे आश्वासन खासदार राजेंद्र गावित यांनी यावेळी दिले.