काँग्रेस मुख्यमंत्र्यांविरोधात मुख्य निवडणूक आयुक्तांकडे तक्रार करणार
मुंबई : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भारतीय जनता पक्षाकडून वारंवार निवडणूक आचारसंहितेचा भंग आणि सत्तेचा दुरुपयोग करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला असून, यासंदर्भात देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांकडे काँगेस उद्या लेखी तक्रार करणार आहे
भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे भाजप खासदार नाना पटोले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिल्याने तसेच पालघरचे भाजप खासदार चिंतामण वनगा यांचे निधन झाल्यामुळे या दोन मतदारसंघात पोट निवडणूक पार पडली आहे . भंडारा गोंदियातून राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे विजयी झाले तर अटीतटीच्या ठरलेल्या पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीत काँगेस मधून भाजपवासी झालेल्या राजेंद्र गावित यांचा विजय झाला. दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास यांनी हि निवडणूक शिवसेनेच्या तिकिटावर लढवली .श्रीनिवास चिंतामण वनगा यांना या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची, बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली तर काँगेस- राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दामू शिंगडा या ठिकाणी पाचव्या क्रमांकावर राहिले . या पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भारतीय जनता पक्षाकडून वारंवार निवडणूक आचारसंहितेचा भंग आणि सत्तेचा दुरुपयोग करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे या निवडणुकीत संपूर्ण निवडणूक यंत्रणा सत्तेच्या दबावाखाली काम करत होती का? अशी शंका निर्माण करणारी परिस्थिती संपूर्ण निवडणूक प्रक्रियेदरम्यान दिसून आली. यासंदर्भात काँग्रेस पक्षाने वेळोवेळी निवडणूक निर्णय अधिका-यांकडे तक्रारी केल्या मात्र त्यांच्याकडून कोणतीही कारवाई न झाल्याने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांच्यासह काँग्रेस पदाधिका-यांचे शिष्टमंडळ उद्या मंगळवार, दि. ५ जून रोजी सकाळी ११ वाजता दिल्ली येथे देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांची भेट घेऊन तक्रार दाखल करणार आहे.