मंत्रालयाच्या तिस-या मजल्यावर महिलेची घोषणाबाजी
मुंबई : निलंबित झालेल्या पोलिस पतीला कामावर घ्यावे म्हणून मंत्रालयाच्या तिस-या मजल्यावर आज एका महिलेने “वंदे मातरम” “जय किसान” अशा घोषणा दिल्या. या महिलेचे केवळ घोषणाबाजी केली असून, आत्महत्येचा प्रयत्न केला नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
सध्या नागपूर येथे पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने मंत्रालयात शुकशुकाट असताना आज दुपारच्या सुमारास धनश्री पाटील या ३० वर्षीय महिलेने मंत्रालयाच्या तिस-या मजल्यावरील सरकत्या जिन्यावरून वंदे मातरम, जय किसान अशा घोषणा दिल्या. याची खबर मिळताच मंत्रालयात सुरक्षेवर तैनात असलेल्या पोलीसांनी या महिलेला ताब्यात घेतले. ही महिला अंधेरी येथे राहणारी असून,निलंबित झालेल्या पोलिस पतीला कामावर घ्यावे म्हणून अधिकाऱ्यांना भेटण्यास आली होती. असे सुत्रांनी सांगितले. या महिलेने केवळ घोषणाबाजी केली असून, आत्महत्येचा प्रयत्न केला नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. पोलीसांनी या महिलेला ताब्यात घेतल्यानंतर पुढील तपास मरीन ड्राईव्ह पोलीस करीत आहेत.