…जेव्हा मुख्यमंत्री पोलीसांसोबत भोजनाचा आस्वाद घेतात!
नागपूर : पावसाळी अधिवेशनासाठी राज्याच्या विविध भागातून सुमारे ४ हजार ८०० पोलिस नागपूर शहरात आलेले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथील प्रादेशिक पोलिस प्रशिक्षण केंद्रात बंदोबस्तावरील पोलिसांची भेट घेवून त्यांच्या समवेत मुक्त संवाद साधला. यावेळी त्यांनी पोलिसांसमवेत रांगेत उभे राहून स्वतः जेवण घेतले. तसेच पोलिसांसमवेत पंगतीत बसून मुख्यमंत्र्यांनी भोजनाचा आस्वाद घेतला. त्यांनी पोलिसांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. प्रत्येकाच्या जवळ जावून मुख्यमंत्री त्यांची राहण्याची, जेवण्याची, वैद्यकीय सुविधांची माहिती घेत होते. स्वत: मुख्यमंत्र्यांकडुन झालेल्या या आस्थेवाईक चौकशीने पोलिसही भारावून गेले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज सायंकाळी या प्रशिक्षण केन्द्रातील निवासी पोलिसांची भेट घेतली. राज्याच्या विविध भागातून राज्य पोलिस दल, महामार्ग सुरक्षा पथक, मुंबई रेल्वे या विविध दलाचे सुमारे ४ हजार ८०० पोलिस सध्या अधिवेशन कर्तव्यावर तैनात आहेत. पोलिस आयुक्तालयामार्फंत शहरातील ५६ ठिकाणी त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. निवासी ठिकाणापासून बंदोबस्ताच्या ठिकाणापर्यंत जाण्या-येण्यासाठी वाहनाची उपलब्धता करण्यात आली आहे. तसेच बंदोबस्ताच्या ठिकाणी दुपारी पोलिसांसाठी बफे पध्दतीनुसार जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. आरोग्य तपासणीसाठी १० वैद्यकीय पथके तैनात असून पॉलीक्लिनीक मार्फंतही पोलिसांना आरोग्य सुविधा देण्यात येत आहे. महिला पोलिसांसाठी फिरत्या शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व सुविधांची मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी माहिती घेतली.
बंदोबस्तासाठी गावाकडून लांब आलो असलो तरी नागपूर पोलिस आयुक्तालयाने चांगल्या सुविधा दिल्याने येथील कर्तव्य कालावधी आनंददायक आणि समाधानकारक राहिला, अशी प्रतिक्रिया नाशिक येथील सहाय्यक पोलिस निरिक्षक वाल्मीक रोकडे यांनी यावेळी दिली.
पोलिसांसमवेत संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले की, मोठया कालावधीनंतर नागपूरात पावसाळी अधिवेशन होत आहे. त्यामुळे या अधिवेशनाचे एक वेगळे आव्हान आपल्या समोर होते. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आपल्याला मोठ्या पावसाचा सामना करावा लागला. या कठिण प्रसंगी बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलिसांनी फार चांगले कार्य केले. चोख बंदोबस्त ठेवण्यापासून लोकांना मदत करण्यापर्यंतचे त्यांचे कार्य निश्चितच आर्दशवत होते, असे मुख्यमंत्री म्हणाले.
पोलिसांच्या हितासाठी राज्य शासन अनेक महत्वपूर्ण निर्णय घेत आहे. राज्याच्या सर्व भागात पोलिसांसाठी ५० हजार नवीन निवासस्थाने बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पोलिसांना स्वमालकीचे घर मिळावे यासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे. पोलिसांना वैयक्तीक घर खरेदी करिता आतापर्यंत २०८ कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात आले असून यापेक्षा अधिक रक्कम अजून दिली जाईल. महाराष्ट्र पोलिस दल हे देशातील अग्रगण्य पोलिस दल आहे. आपण सर्वांच्या एकत्रीत प्रयत्नातून याला जगातील उत्तम पोलिस दल बनविण्यासाठी कार्य करु, असे मुख्यमंत्री म्हणाले.
नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यावेळी म्हणाले की, गृह विभागाचा कार्यभार मुख्यमंत्र्यांकडे असल्यामुळे मागील तीन वर्षात पोलिसांच्या अनेक प्रलंबीत प्रश्नांना न्याय मिळाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे पोलिस दल अधिक सक्षम बनत आहे. नागपुरातही पोलिस दलाच्या सक्षमीकरणातून गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यात मोठे यश आले आहे. पासपोर्ट पडताळणीचे सुलभीकरण, भरोसा सेल, अत्याधुनिक अशी कंन्ट्रोल रुम, पोलिस ड्युटी मीट सारखा उपक्रम, डिजीटल चार्जशीट, ट्राफिक क्लबसारखी संकल्पना राबविण्यात आली आहे. एका खाजगी सर्वेक्षणानुसार जनताही पोलिस दलाच्या प्रतिमेविषयी तसेच वागणुकीविषयी समाधान व्यक्त करित असून त्यात १३५ ते १५७ टक्के सुधारणा झाल्याचे नमूद केले आहे, असे ते म्हणाले.
धुळे जिल्ह्यातील पोलिस शिपाई योगेश ठाकूर यांनी पुष्पगुच्छ देवून मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत केले.